मुंबई \ ऑनलाईन टीम
देशात कोरोना प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणास लस तुटवड्यामुळे खंड पडत आहे. केंद्र सरकारने १७ टक्के लोकांच लसीकरण झाल्याचं म्हटलं आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारने १७% लोकांचं लसीकरण केल्याचं जाहीर केलं. पण लसीचे २ डोस किती लोकांना मिळाले? कोवॅक्सिन आणि सीरमने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तेवढी लस भारताला दिलीच नाही, मग या एवढ्या लसी आल्या कुठून? मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा, अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने १७ कोटी लोकांना लस दिलेली परवा जाहीर केल्याचे आपण पाहिले असेल.खरंतर दोन लस दिल्यानंतर लसीकरण प्रक्रिया पूर्ण होते. आता १७ कोटीमधील किती जणांना दोनदा लस मिळाली? हा एक प्रश्न आहे आणि १७ कोटी लस ही कुठून आणली आहे. कारण, जे काही पुनावाला जाहीर करत आहेत त्यांच्या हिशाबाने तर त्यांनी एवढी लस भारतला दिलेलीच नाही. मग ही लस आली कुठून?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आपल्या देशाची समजा १३० कोटी लोकसंख्या असेल, तर २६० कोटी लस आपल्याला लागणार आहे व त्यात जर वाया जाणारी संख्या पकडली तर किमान ३० कोटी लशींचे डोस आपल्या देशाला हवे आहेत. आज तेवढ्या प्रमाणात लस आपल्याजवळ उपलब्ध नाही. २६ एप्रिलला आम्हाला केंद्र सरकारने ऑर्डर दिली आहे, असे पूनावालानी सांगितलं आहे. म्हणजे त्यातही खोटं बोलण्याचं काम, या महामारीत तरी खरं बोला. सांगा लोकांना की आमचं चुकलेलं आहे, देशाची माफी तरी मागा ते देखील नाही करत आणि उलट आपलीच पाठ थोपटायची आणि सेंट्रल व्हिस्टामध्येच आनंदी रहायचं असं जर भाजपचं असेल तर लोकं कधीही माफ करणार नाहीत, असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.