देवगड सभापतीने लक्ष वेधले
वार्ताहर / देवगड:
दोन दिवस सतत कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे तसेच वादळी वाऱयामुळे तांबळडेग गावाला समुद्राने वेढा दिला असून येथील लोकवस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. येथील परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. आपण प्रत्यक्ष या भागाची पाहणी केली आहे. रस्ता, मासे सुकविण्याचा कठडा, झाडे, वीज खांब उन्मळून पडले आहेत. तात्काळ महसूल विभागाने पाहणी करून नुकसानीचा पंचनामा शासनाला सादर करावा, असे निवेदन देवगड तहसीलदारांना सभापती सुनील पारकर यांनी दिले. गुरुवारी तहसीलदार मारुती कांबळे यांना तांबळडेग येथील नुकसानीबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तांबळडेग सरपंच तसेच पदाधिकारी उपस्थित होते. तांबळडेग गावाला समुद्राच्या उधाणाच्या पाण्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. मच्छीमारांसाठी बांधण्यात आलेला मासे सुकविण्याचा कठडाही लाटांमुळे उध्वस्थ झाला आहे. स्मशानभूमीतील शेडही कोसळून गेली आहे. सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच वाडीत जाणारा रस्ताच वाहून गेला आहे. आपण या घटनेची पाहणी केली आहे. समुद्राच्या लाटांमुळे तांबळडेग गाव आता समुद्रात गिळंकृत होणार अशीच विदारकर स्थिती आहे. तसेच जवळच असणारे हिंदळे, मोर्वे, मिठबाव कोंडवाडी, नारिंग्रे ही खाडी किनारी असणाऱया गावांनाही धोका निर्माण झाला आहे. या घटनेची महसूल विभागाच्यावतीने आपण प्रत्यक्ष पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी पारकर यांनी केली आहे.