राजेवाल अन् चढूनी गटात वाद : हरियाणाच्या शेतकरी नेत्याची अधिक जागांची मागणी
वृत्तसंस्था /चंदीगड
पंजाबमध्ये शेतकरी संघटनांदरम्यान तिकिटवाटपावरून मतभेद निर्माण झाले आहेत. हरियाणाचे शेतकरी नेते गुरनाम चढूनी यांनी 25 जागांची मागणी केली. तर बलवीर राजेवाल यांच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या 22 शेतकरी संघटना त्यांना केवळ 9 जागा देण्यास तयार आहे. या मुद्दय़ावरून राजेवाल आणि चढूनी गटात वाद निर्माण झाला आहे. पंजाबच्या 22 संघटनांचे नेते रुल्दू सिंह मानसा यांनी चढूनी यांची एक युनियन असल्याने त्यांना त्यानुसार जागा दिल्या जात असल्याचे सांगितले.
आमचा वेगळा संयुक्त संघर्ष पक्ष असल्याने आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांच्या संयुक्त समाज मोर्चासोबत आघाडी करत आहोत. त्यांच्यासोबत आणखीन अनेक संघटना जोडल्या गेल्या आहेत. या संघटनांना देखील अनेक ठिकाणी उमेदवारी हवी असल्याचे चढूनी गटाचे प्रिन्स वडैच यांनी म्हटले आहे. आंदोलन संपल्यावर राजेवाल यांनी निवडणुकीत सामील होण्याचा निर्णय घेतला. याबद्दल माझ्याशी कुठलीच चर्चा करण्यात आलेली नाही. माझा भागातील 6 संघटना आमच्यासोबत आहेत. राजेवाल हे पुरेशा जागा देत नसल्याने आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागू शकतो. राजेवाल गटाने आम्हाला 25 जागा द्याव्यात, अन्यथा आम्ही सर्व मतदारसंघांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करू असे गुरनाम चढूनी यांनी म्हटले आहे.