जलाशय ९६ टक्के भरल्याने संभाव्य पुरस्थितीचा विचार करून पाणी सोडण्याचा निर्णय
धामोड / प्रतिनिधी
धामोड ता. राधानगरी येथील तुळशी जलाशयात ९६ टक्के इतका पाणीसाठा झाल्याने आज सोमवार २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जलाशयाच्या तिन वक्र दरवाजातून १०१६ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग तुळशी नदीपात्रात सोडण्यात आला. संभाव्य पाऊस , जलाशयात येणारा येवा व पंचगंगा पुरस्थिती याचा विचार करता जलाशयातून पाणी सोडण्यात आले.
प्रारंभी पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी विलास बोडके यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली वहाण्यात आली .जलपूजन श्रीफळ वाढवून शाखाअभियंता विजयराव आंबोळे यांच्या शुभहस्ते, जी .एस.सावेकर, एम.के. पाटील, अशोक पाटील , पांडूरंग मगदूम , बाळासो मगदूम,डी.बी.साबणे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
धामोड( ता. राधानगरी) येथील तुळशी नदीवर १९६५ साली बांधकामास सुरवात झालेल्या जलाशयात १९९७८ पासून पाणी साठवण्यास सुरवात झाली. ६१६ .९१ मीटर पाणी साठवण( ३ .४७ टीएमसी ) क्षमता असणाऱ्या या जलाशयाच्या पाण्यामुळे जवळपास ५८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन हरीतक्रांती झाली. नदीतिरावर ३२०० वैयक्तिक व सार्वजनिक पाणी योजना कार्यान्वित असून हरितक्रांतीस वरदान ठरलेला जलाशय म्हणून ‘तुळशी ‘ जलाशयाकडे पाहीले जाते.
गुरुवारी एका दिवसात धरण क्षेत्रात ८९५ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. आज अखेर धरण क्षेत्रात ३०१२ मिली मिटर इतक्या पावसाची नोंद झाली असून ३३३६.३२१ दलघफू पाणीसाठा झाला आहे. ६१६ .१६ मीटर इतकी पाणी पातळी होऊन धरण ९६ टक्के इतके भरले. केळोशी लघुप्रकल्पाच्या उजव्या सांडव्यातून तसेच पाऊस,अंतर्गत ऊगाळ, ओढे -नाले या माध्यमातून जवळपास १००० ते १२०० क्युसेक्स येवा येत आहे. संभाव्य पाऊस व पंचगंगा पुरस्थितीचा विचार करून आज जलाशयातून पाणी सोडण्यात आले. नदीतिरावरील ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन शाखा अभियंता ०ही.०ही. आंबोळे यांनी केले आहे.
गतसाली १५ ऑगष्ट रोजी जलाशय भरले होते. चालू वर्षी लवकर पावसाने सुरवात केल्याने जलाशयात ९६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तर १९७८पासून जलाशय २२ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे.