गृहमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
त्रिपुरामध्ये पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारी दिल्लीत पोहोचले आहेत. 16 सदस्यीय शिष्टमंडळाने सोमवारी गृह मंत्रालयाबाहेर निदर्शने केली. तृणमूल नेत्या सयानी घोष यांना अटक झाल्याप्रकरणी खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागत होते. पण या खासदारांना ही वेळ मिळाली नसल्याचे समजते.
त्रिपुरा पोलिसांनी तृणमूल युवा मोर्चा प्रमुख आणि बंगाली अभिनेत्री सयानी घोष यांना अटक केली होती. सयानी यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूलच्या शिष्टमंळाने गृह मंत्रालयाबाहेर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आणि तृणमूल यांच्यातील हा राजकीय संघर्ष अगरतळा पालिकेच्या निवडणुकीमुळे निर्माण झाला आहे. ही निवडणूक 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निदर्शनांमध्ये सुखेंदु शेखर रॉय, कल्याण बॅनर्जी, डेरेक ओ ब्रायन, सौगत रॉय आणि डोला सेन यांनी भाग घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या टिप्पणींच्या आरोपाप्रकरणी सयानी घोष विरोधात भादंविचे कलम 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 153 अ (दोन समुहांमधील वैमनस्याला बळ देणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. घोष आणि त्यांच्यासोबत पोहोचलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान कथितरित्या दगडफेक केली होती अशी माहिती पोलीस अधिकारी रमेश यादव यांनी दिली आहे.