प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकारने दक्षिण गोवा जिल्हय़ात तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (नॅशनल सिक्युरीटी ऍक्ट) लागू केला असून क्रांती दिनादिवशीच तो लावला म्हणून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवून त्याचा निषेध केला आहे.
क्रॉग्रेस पक्षाने गोवा क्रांती दिनी बेजबाबदार भाजप सरकारविरोधात आवाज उठवून गोव्याला भाजपमुक्त करण्याचा नारा दिल्यानंतर घाबरलेल्या भाजप सरकारने व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याचा आदेश जारी केला. जनतेचा, विरोधी पक्षांचा आवाज दडपून टाकण्यासाठी गोमंतकीय जनतेच्या मनात भय निर्माण करण्यासाठी हा आदेश काढण्यात आला असून तो निषेधार्ह असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
दक्षिण गोव्यातील काही अनुचित घटनाप्रकारांमुळे हा कायदा तेथे लावण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. अचानकपणे लावण्यात आलेल्या या कायद्यामुळे आश्चर्य प्रकट करण्यात येत आहे. क्रांतीदिनाच्या मुहुर्तावर तो लागू करण्यात आला असून त्याची मुदत तीन महिन्यांसाठी कशाला? असा प्रश्नही त्यामुळे निर्माण झाला आहे. ती मुदत त्यानंतर वाढवली जाऊ शकते असेही सांगण्यात आले.