ऐतिहासिक टप्पा पार- डिसेंबरपर्यंत आणखी 136 कोटी डोस उपलब्ध होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने आतापर्यंत ऐतिहासिक यश मिळवले आहे. भारतात कोरोना लसींची संख्या 50 कोटींच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर यासंबंधीची घोषणा करत ‘सर्वांचे अभिनंदन आणि आरोग्य कर्मचाऱयांचे आभार’ असे ट्विट केले आहे. तसेच डिसेंबरपर्यंत भारतात सिरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडून कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे आणखी 136 कोटी डोस उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतात आतापर्यंत 50 कोटीहून जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात आतापर्यंत लसीचे 50 कोटी 3 लाख 48 हजार 866 डोस देण्यात आले आहे, यात पहिल्या आणि दुसऱया डोसचाही समावेश आहे. शुक्रवारी दिवसभरात 43.29 लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आल्यामुळे भारताने 50 कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. देशात 16 जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू झाल्यानंतर जवळपास आठ महिन्यात ही मजल गाठण्यात यश मिळाले आहे.
दर महिन्याला 4 कोटी डोस वाढवणार
चालू महिन्यापासून देशात लसीकरणाचा वेग वाढणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एसआयआय) आणि भारत बायोटेक या देशातील दोन मोठय़ा लस उत्पादक कंपन्या दर महिन्याला कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या 4 कोटीहून अधिक डोस तयार करतील असे केंद्राने सांगितले. कोव्हिशिल्डचे उत्पादन दरमहा 11 ते 12 कोटींनी वाढणार आहे. त्याचबरोबर भारत बायोटेक 2.5 ते 5.8 कोटीपर्यंत कोव्हॅक्सिनचे उत्पादनही करणार आहे. या लसनिर्मितीला देशातील जनतेला थेट फायदा होईल, असे मांडविया यांनी स्पष्ट केले.
पीएमओकडून संसदेत निवेदन
वर्षाच्या अखेरीस देशात कोरोनाचे 136 कोटी डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) संसदेत दिली आहे. ऑगस्टमध्ये कोव्हॅक्सिनचे उत्पादन 2.65 कोटी, कोव्हिशिल्डचे उत्पादन 23 कोटी याप्रमाणे एकंदर महिन्यामध्ये एकूण 25.65 कोटी डोस तयार केले जातील, असे पीएमओने जारी केलेल्या नोटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या महिनानिहाय लसीकरणाची आकडेवारीही देण्यात आली आहे.
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोनायोद्धय़ांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर दुसऱया टप्प्यात 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसोबत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या लोकांचे लसीकरण 1 मार्चपासून सुरू झाले. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येकासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. तर 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे.