रुग्ण बरे होण्याचा उच्चांक- दिवसभरात 3.86 लाख रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाची दुसरी लाट अधिक भयानक होत असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या चार दिवसांपासून स्थिर पातळीवर आहे. सलग चौथ्या दिवशी 24 तासात 4 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी दिवसभरातही 4 लाख जणांना कोरोनाची बाधा झाली असून 4,091 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, याचदरम्यान एक दिलासादायक गोष्ट म्हणजे मागील 24 तासात 3 लाख 86 हजार 444 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एका दिवसात बरे होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी आकडा आहे. देशात 1 मे पासून सतत तीन लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आलेले दिसत आहे.
गेल्या महिन्याभरात रुग्णसंख्या वाढत असली तरी आता ती 4 लाखांच्या आसपास स्थिर पातळीवर आहे. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीपासून देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. 6 मे रोजी 3.31 लाख, 7 मे ला 3.18 लाख आणि 8 मे ला विक्रम करत 3.86 लाख रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शनिवारी देशात 4 लाख 3 हजार 738 इतकी नवीन प्रकरणे समोर आली आहेत. नव्या बाधितांमुळे कोरोनाची लागण झालेल्या एकूण बाधितांची संख्या 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 इतकी झाली. शनिवारी दिवसभरात 3 लाख 86 हजार 444 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 जण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 37 लाख 36 हजार 648 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील स्थितीत सुधारणा
महाराष्ट्रात शनिवारी 56 हजार 578 जण कोरोनाबाधित झाले. 82 हजार 266 जणांनी कोरोनावर मात केली. तर 864 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत 50.53 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 43 लाख 47 हजार 592 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 75 हजार 277 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 6.30 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशात शनिवारी 26 हजार 636 लोकांना कोरोनाची लागण झाली. 34 हजार 721 जणांनी कोरोनावर मात केली आणि 297 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या राज्यात 14.80 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 12.19 लाख जण बरे झाले आहेत, तर 15 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अजूनही 2.45 लाख इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. उत्तरप्रदेशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याचा दावा केला जात असून प्रत्यक्षात तेथील संसर्गस्थिती भयावह असल्याची माहिती स्थानिकांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांमधून दिली जात आहे.
दिल्लीमध्ये 17 हजार 364 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यात 20 हजार 160 जण बरे झाले आहेत आणि 332 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत 13.10 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 12.03 लाख जण बरे झाले आहेत. तर 19,071 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर 87 हजार 907 जणांवर उपचार सुरू आहेत.
छत्तिसगड येथे शनिवारी 12 हजार 239 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 12 हजार 198 जण बरे झाले आहेत. तर उपचारादरम्यान 223 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या राज्यात 8.42 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 7.01 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे तर 10,381 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1.30 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मध्यप्रदेशात सुधारणा गरजेची
गुजरातमधील परिस्थितीही सुधारली असून शनिवारी 11 हजार 892 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 14 हजार 366 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र मध्यप्रदेशात 11 हजार 598 नवे रुग्ण सापडले असून केवळ 4 हजार 445 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेने अधिक सजग होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.