प्रतिनिधी / शाहुवाडी
रात्रीची वेळ नागरिकांची लगबग आणि अचानक ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने घराच्या नजिक केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ट्रॅक्टर थांबला अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची घटना मंगळवार पेठ मलकापूर येथे रविवारी सायंकाळी घडल्याने परिसरातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून ऊस वाहतूक ट्रॅक्टर याबरोबरच पोलीस प्रशासन आणि कारखाना यांनी खबरदारी घेऊन तात्काळ यावर उपाययोजना करावी अन्यथा या मार्गावरील वाहतूक बंद करणार असल्याचा इशारा मंगळवार पेठेतील नागरिकांनी दिला आहे.
मंगळवार पेठ मलकापूर येथून विविध कारखान्यांना जाणाऱ्या उसाची वाहतूक ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जाते एका बाजूला उतार व दुसर्या बाजूला चढ असल्याने ट्रॅक्टर धारकांची चांगलीच कसरत होत आहे. त्यातच दोन्ही बाजूला घर आणि नागरिकांची वर्दळ कायमच असते अशा परिस्थितीत ऊसाने भरलेला ट्रॅक्टर जाण्यासाठी ट्रॅक्टर चालक कसोशीने प्रयत्न करत असतात मात्र वाहन अवजड असल्याने आणि लोड असलेले ट्रॅक्टर चढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. दुर्दैवाने ट्रॅक्टरचढाने योग्यपणे मार्गस्थ झाला नाही तर चालक त्याठिकाणी कसरत करून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आजूबाजूला घर असल्याने दुर्दैवाने सदर वाहन घरावर जाण्याचा धोका होत आहे. अशीच परिस्थिती रविवारी सायंकाळी घडली उचत कडून येणारा ऊसाने भरलेला ट्रॅक्टर केवळ दैव बलवत्तर म्हणूनच घरानजीकच थांबला मात्र घरातील नागरिकांनी जीव मुठीत घेऊन केलेली धावपळ आणि परिसरातील नागरिकांच्या निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण मात्र सर्वत्र धोकादायक ठरत असल्याचे दिसत आहे.
पर्याय शोधणं गरजेचं
या मार्गावरुन केली जाणारी ऊस वाहतूक या ऊसतोडी संपेपर्यंत सुरू राहणार असल्या तरी देखील मात्र या गर्दीच्या ठिकाणांवर वरील मार्गातून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर काढण्यासाठी याच्यावर गांभीर्यपूर्वक विचार करून पर्याय शोधणं तितकच गरजेचं आहे किंबहुना एखादा दुर्दैवी अपघात अथवा वाईट घटना घडण्यापूर्वी संबंधित घटकांनी याबाबत विचार विनिमय करण्याच्या तीव्र प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांच्यातून उमठू लागल्या असून कारखाना व पोलीस प्रशासन यांनी तात्काळ याबाबत उपाययोजना करावी अन्यथा या मार्गावरील वाहतूक रोखणार असल्याचा इशाराही या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
जीव मुठीत घेऊनच वावर
दरम्यान मंगळवार पेठ येथील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊनच घरात वास्तव्य करावं लागत आहे या मार्गावरून अनेक टू व्हीलर धारकांची जीवघेणी स्पर्धा त्यातच अवजड वाहनांची सुरू असलेली वाहतुक या मुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्याच बरोबर लहान मुलांना ही जीव मुठीत घेऊनच आपल्या घरात वास्तव्य करावं लागत आहे या सर्व बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार होऊन या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या संतप्त भावना नागरिकांच्यातून उमटू लागल्या आहेत.