मोठे रॅकेट शक्य, अतिदक्षतेचा इशारा, नागरिकांना सावधानतेच्या सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
दहशतवादाशी संबंध असलेले दोन युवक सांबरा येथून बेपत्ता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या युवकांपासून बेळगावला धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) दिला असून कोणत्याही संशयास्पद हालचालींवर नागरिकांनी लक्ष ठेवावे आणि सावध रहावे, अशी महत्त्वाची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
हे दोन अज्ञात युवक काही दिवसांपासून सांबरा परिसरात रहात होते, असे समजते. मात्र आता ते बेपत्ता झाले असून ते कोठे गेले असावेत, याविषयी स्थानिकही अनभिज्ञ आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी गुप्तपणे मोहीम हाती घेतली आहे. या युवकांचे संबंध काश्मीर येथील दहशतवाद्यांशी असू शकतात. तसेच त्यांना स्थानिक समाजकंटकांचे आणि गुंडांचे संरक्षण असू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आता हे युवक बेपत्ता झाल्याने त्यांच्याविषयीचा संशय वाढला असून प्रशासन सतर्क झाले आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
हे दोन युवक एका मोठय़ा रॅकेटचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रॅकेटची पाळेमुळे काश्मीरपर्यंत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच प्रशासन अत्यंत वेगाने पावले टाकत आहे. नागरिकांनीही सावध राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे सांगण्यात आले आहे. या रॅकेटचा पर्दाफाश लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रथम या दोन बेपत्ता युवकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. युवकांचा माग काढण्यासाठी गुप्तचर विभागाचेही साहाय्य घेण्यात येत आहे. काही अनाहुत घटना घडण्याच्या आत त्यांना जेरबंद करण्याचा चंग प्रशासनाने बांधला आहे, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कोणता धोका होऊ शकतो?
बेळगाव शहर किंवा आसपासच्या उपनगरीय भागांमध्ये बॉम्ब स्फोटासारखी कृत्ये करून शांततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नेहमी शांत असणाऱया बेळगावात हिंसाचार घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यामुळे नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी काय करावे?
आपल्या आजूबाजूच्या हालचालींवर, विशेषतः बसथांबे, रेल्वेस्थानक, इमारतींची बेसमेंट्स, हॉटेल, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये किंवा जेथे अधिक संख्येने लोक जमतात अशी स्थाने किंवा आस्थापने येथे नजर ठेवून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळविण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अपरिचित व्यक्तींची संशयास्पद हालचाल आपल्या नजरेस आल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. मात्र सावधानता दाखवून संभाव्य धोका टाळण्यात महत्त्वाचे सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.