प्रतिनिधी / लांजा
बिबटय़ाची नखे व पंजे कापून त्याला जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षासह तिघांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण परस्पर दडपण्याचा प्रयत्न सुरु असतानाच वनविभागाने धडक कारवाई करत हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
वेरवली बुद्रुकचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिनेश राजाराम पवार, शंकर सखाराम देवळेकर, रमेश आत्माराम साळसकर अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांना मंगळवारी सकाळी वनविभागाने ताब्यात घेतले असून त्यांनी गुह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून बिबटय़ाची तीन नखे हस्तगत करण्यातही वनविभागाला यश आले आहे.
वनविभागाने दिलेल्या महितीनुसार तालुक्यातील वेरवली पवार वाडीतील जयश्री गणपत सळसकर यांच्या काजूच्या बागेमध्ये बिबटय़ाला जमिनीत पुरल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे वनविभागाने वेरवली पवारवडी येथे चौकशी सुरु केली. यामध्ये दिनेश पवार याने अन्य आरोपींच्या मदतीने बिबटय़ाची नखे कापून स्वतःजवळ ठेवली. त्यानंतर बिबटय़ाला जयश्री यांच्या जागेत पुरले. या प्रकारची माहिती कुठेही दिली जाणार नाही यासाठी तिघांनीही एकमेकांना आश्वासन दिले. त्यानंतर बिबटय़ाची नखे त्यांनी वाटून घेतल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱयानी वेरवली येथे जात घटनेची चौकशी सुरु केली. अधिक माहिती मिळवताना बोलण्यामध्ये विसंगती आढलल्याने संशय अधिक बळावला. सखोल चौकशी सुरु करताच त्यातील एकाने खरी महिती दिली. त्यामुळे बिबटय़ाला पुरलेल्या ठिकाणापर्यंत पोचणे वनविभागाला शक्य झाले. या कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तालुका वनाधिकारी सागर पताडे, वनरक्षक विक्रम कुंभार, देवरुख वनरक्षक मिलिंद डाफले, संजय रंदिर आदी उपस्थित होते.
गुन्हा कबूल केल्यानंतर त्या तिघांना घेऊन वनविभागाने जमिनीत पुरलेल्या बिबटय़ाला बाहेर काढले. पंचनाम्यामध्ये बिबटय़ाचे काही अवयव गायब असल्याचे निदर्शनास आले. बिबटय़ाचा मृत्यू 2 ते 3 दिवसांपूर्वी झाल्याचा निष्कर्षही काढण्यात आला. बिबटय़ाचे अवयव काढून परस्पर दफन करण्याचा प्रकार घडल्याचे यामध्ये स्पष्ट झाले. गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षानेच केलेल्या या कृत्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोपींनी गुन्हा कबुल केला असून मंगळवारी न्यायालयाने त्यांना 27 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत्यूचे गुढ कायम
बिबटय़ाचे अवयव काढल्याप्रकरणी आरोपी गजाआड झाले असले तरीही बिबटय़ाचा मृत्यूचे गुढ कायम आहे. यामध्ये बिबटय़ाची हत्या करण्यात आले की नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर अवयव काढण्यात आले याबाबत उलट-सुलट मते व्यक्त होत आहेत.