महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
परम गूढ कन्यागार । भोंवता तळवटीं रक्षकभार ।
तेथ अनिरुद्ध निरंतर । क्रीडातर आन नुमजे ।
नित्य नूतन वाढवी स्नेह । तये उषेनें घालूनि मोह ।
स्वाधीन केला इंद्रियसमूह । नुमजे गताहर्गणातें तो।
मज अंतरली द्वारकापुरी । कैंची कोण हे नव अंतुरी ।
किती क्रमिल्या दिवसरात्री । तें अंतरिं उमजेना ।
असो अनिरुद्धाची कथा । निगूढ एकान्ती वर्ततां ।
पुढें प्रकट झाली वार्ता । तें नृपनाथा अवधारिं ।
ऊषेचे अनिरुद्धावरील प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागले. ती बहुमोल वस्त्रे, फुलांचे हार, सुगंधी द्रव्ये, धूप, दीप, आसन, सुमधुर पेये, खाद्यपदार्थ, मधुर वाणी इत्यादींनी त्याची सेवा करून त्याला खूष करीत असे. आपल्या प्रेमाने ऊषाने त्याचे मन जिंकून घेतले होते. त्या अंत:पुरात गुप्तपणे तिच्या सहवासात राहिलेल्या अनिरुद्धाला किती दिवस निघून गेले, याचा पत्ताच लागला नाही.
पूर्वोक्त प्रकारें यथोपचार ।
अनिरुद्धनामा जो यदुवीर ।
तेणें उषेतें निरंतर ।
भोगितां फार दिन गेले ।
जियेचें पातिव्रत्य अभंग ।
लौकिकीं अविदित तो प्रसंग ।
कन्याकाव्रताचा झाला भंग ।
रक्षकवर्ग गुजबुजिती ।
अनिरुद्धप्राप्तीचा परम हर्ष ।
नव नव क्रीडेचा उत्कर्ष ।
निर्भय निःशंक दुर्धर्ष ।
चिन्हे अशेष प्रकटलीं ।
रमणें रमविली जे कां रमणी । ते जाणों ये अवयवचिह्नी । अपरें चिन्हे संभाषणीं ।
क्रीडावर्तनीं प्रकटती । पुरुषभुक्त झाली उषा ।
अनूढा असतां पावली दोषा । झांकू न शके हेतुविशेषा । रक्षकां अशेषां जाणवलें । दंतक्षतें उमटती अधरिं । नखक्षतें उरोजांवरी । कारणद्रावलांछनें वस्त्रीं । रहस्य किंकरी प्रकाशिती । कर्णोपकर्णीं फांकली गोष्टी । रक्षक लक्षिती सूक्ष्मदृष्टी । गोचर होतां सर्व राहटी । म्हणती खोटी चर्या हे । राजकन्या झाली भ्रष्ट । आम्हां भोंवेल हें अरिष्ट । यालागीं आतांचि नृपासी स्पष्ट । सांगोनि कष्ट निरसावे । कन्यागारिंचे रक्षणगण । वदतीजोहारूनियां बाणचरण । म्हणती कन्येनें दूषण । लाविलें संपूर्ण कुळातें । तुमची कन्या जे कां उषा । रतली कोणा एका पुरुषा । क्रीडासुखें क्रमिती निशा । आम्हीं रहस्या लक्षिलें । दुष्ट कन्येचें चेष्टित । लक्षूनि आम्हीं रक्षक दूत । तुम्हांसि कथिला तो वृत्तान्त । करावें उचित कळे तैसें । गुप्त पुरुष कन्यागारिं । उषेसहित क्रीडा करी । प्रियतम वाटेल जरी अंतरिं । तरी त्या नोवरी सुखें दीजे । अथवा निकरें कराल दण्ड । तरी लौकिकीं होईल भंड । आम्हां रक्षकां जन उदंड । दूषितां तोंड न काढवे । रक्षकीं ऐसिया समाचारा । कथूनि स्वविषयीं परिहारा । देते झाले त्या प्रकारा । म्हणे अवधारा शुकयोगी ।
बाणासुराने आपल्या कन्येच्या उषेच्या रक्षणासाठी रक्षकांकरवी कडेकोट बंदोबस्त केला होता. पण उषेच्या महालात तिचा व अनिरुद्धाचा शृंगार फुलला होता.
ऍड. देवदत्त परुळेकर