अध्याय आठवा
भगवंतांनी यादव कुळाचा नाश करून कृष्णावतार संपवण्याचा निर्णय घेतल्यावर उद्धव अत्यंत दुःखी झाला. कारण देवांच्या सहवासाला तो अंतरणार होता. मला तुमच्याबरोबर घेऊन चला म्हणून त्याने देवांच्या मागे लकडा लावला, पण प्रत्यक्षात ते शक्मय नव्हते. कारण भगवंताच्या धामाला पोहोचण्यासाठी विशिष्ट अशा पात्रतेची गरज असते ती पात्रता उद्धवाच्या अंगी यावी म्हणून भगवंतांनी त्याला उपदेश करायला सुरुवात केली. ती ‘उद्धव गीता’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचाच आपण संक्षेपाने अभ्यास करत आहोत.
श्रीकृष्णांच्या कुळात पूर्वी यदु म्हणून एक महान राजा होऊन गेला. त्यांची एकदा अवधुतांशी गाठ पडते. हे एवढे शांत चित्त समाधानी कसे असा प्रश्न यदुराजांना पडतो. त्यावर उत्तर म्हणून अवधूत सांगतात की, गुरु आहेच! पण जो दुर्गुणी आहे त्याचा दुर्गुण आपल्यात येऊ नये म्हणून त्यालाही मी गुरु केले.’ या गुणीपणाची पण एक गंमत आहे. ती सहसा चटकन लक्षात येत नाही. आपल्या अवतीभोवती पण आपल्याला गुणी माणसे आढळतात.
आपणही मनात म्हणतो की, याच्याकडे उदार वृत्ती हा चांगला गुण आहे तो आपण घेतला पाहिजे. हे ठीक! पण आपल्या आजूबाजूच्या गुणी माणसातल्या चांगल्या गुणांचे दर्शन काही ठरावीक व्यक्तींपुरतेच मर्यादित असते. म्हणजे त्यांच्या मनात हा आपला तो परका असे भाव असल्याने ते ज्याला आपला मानतात त्यांच्यापुरताच त्यांच्या गुणाचा प्रत्यय येतो व इतरांना येत नाही. संत, योगी मंडळींच्या मते अशा माणसाला गुणी म्हणता येत नाही. खरा गुणी तोच जो सर्वांना समान मानतो आणि सर्वांना त्यांच्या गुणाचा प्रत्यय येतो. अवधुतानी ज्यांना गुरु केले आहे व त्यांच्या गुणांचे जे वर्णन केले ते सर्व समानवृत्ती धारण करणारे असून त्यांच्या गुणांचा लाभ सर्वांना मिळत असतो असे आहेत.
अवधुतांचे प्रमुख असे चोवीस गुरु आहेत. त्यापैकी सात गुरुंची माहिती आपण घेतली आता पुढील गुरु अजगर आहे. त्याच्याबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘स्वतःला दुःखभोग व्हावा, हे कुणालाही आवडत नाही. परंतु दैव जसे दुःख मागितल्यावाचून देते, तसेच सुखाचा वाटाही त्याला मिळतो. असे असूनसुद्धा लोक त्यासाठी धडपडत असतात व त्यात वेळ वाया घालवतात. त्यामुळे साऱया आयुष्याचा नाश होतो. याकरिता विषयाची आस्था सोडून परमार्थाच्याच भजनी लागावे. परंतु केवळ परमार्थाच्याच नादाला लागले, तरी देहाला आहार हा लागणारच.
आहाराशिवाय हा देह राहू शकणार नाही. राजा, आहाराशिवाय देह राहू शकेल का या प्रश्नाचे होय असे उत्तर मला अजगराच्या वर्तणुकीवरून दिसले. म्हणून मी अजगराला गुरु करून घेतले. आध्यात्मिक प्रगती होण्याच्या दृष्टीने मला अजगराची वागणूक आदर्श वाटली. अजगर जे मिळेल ते चांगले वाईट असा कसलाही विचार न करता खात असतो. घाबरून भीतीने धीर सोडत नाही. तो दृढनिश्चयी असतो. मिळेल ते खातो किंवा वारा पिऊन राहतो. अंगी प्रचंड शक्ती असूनसुद्धा तिचे प्रदर्शन करत नाही. शांत राहतो.
योग्यानेही सदैव आत्मरसात तृप्त होऊन जे मिळेल ते खावे. त्याला अमुक एका चवीची गोडी अशी नसावी. अजगराने जबडा पसरल्यावर त्यातून वारा जरी आत गेला तरी तो ते भक्षण करतो. तसेच योग्याने वारा पिऊन राहण्याची तयारी ठेवावी. अजगराला अनेक दिवस आहार मिळाला नाही तरी तो एका जागी स्वस्थ पडून असतो. त्याप्रमाणे योग्याने दीर्घ आसन करून निदेशिवाय रहावे. कारण योग्याला निद्रा अशी नसतेच. तो आपला निजसुखाच्या तंद्रीत असतो. दैवयोगाने जे मिळेल ते त्याने खावे.
अजगराचे सामर्थ्य अफाट, देह व पराक्रम प्रचंड! तरी तो देहासाठी काहीही न करता तोंड पसरून बसलेला असतो. त्याचप्रमाणे योग्याचे शरीर सामर्थ्य अफाट असते, बुद्धी तीव्र असते, इंद्रियबलही अलौकिक असते पण आहाराचा विचारही त्याच्या मनात येत नाही, तो आपल्या आत्मानंदात निमग्न असतो.