डॉ. बी. जी. मुलीमनी यांचे प्रतिपादन, डॉ. वाय. के. प्रभू-आजगावकर स्मृती व्याख्यानमाला
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडविण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. यामध्ये कौशल्याधारीत शिक्षणावर अधिक भर देण्यात आला आहे. ज्ञानावर आधारीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर हे धोरण अवलंबून आहे. जगात सर्वाधिक युवा ताकद भारताकडे असल्याने यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळाल्यास हे शैक्षणिक धोरण जगात क्रांती घडविणारे ठरेल, असे प्रतिपादन गुलबर्गा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. जी. मुलीमनी यांनी केले.
साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी (एसकेई)च्यावतीने व तरुण भारत ट्रस्ट प्रायोजित डॉ. वाय. के. प्रभू- आजगावकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. मंगळवारी कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात पार हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. बी. जी. मुलीमनी यांनी ‘21 व्या शतकातील शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन किरण ठाकूर, अध्यक्ष सेवंतीलाल शाह, सेपेटरी मुरलीधर सामंत व आर. बी. देशपांडे उपस्थित होते.
शिक्षक हवा संशोधकाच्या भूमिकेत
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यापूर्वी प्रत्येक विद्यापीठ व कॉलेजमध्ये यावर संशोधन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देण्याचा विचार करण्यात आला आहे. यापुढे शिक्षकाला केवळ अभ्यासक्रम शिकवून चालणार नाही तर त्यासोबत त्यांना नवनिर्मितीची कास धरावी लागणार आहे. शिक्षक नेहमी संशोधकाच्या भूमिकेत असल्याने त्यांनाही नवीन संकल्पना समजण्यास मदत होईल. देशात ग्रामीण भागाची संस्था अधिक आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना डोळय़ांसमोर ठेवून शिक्षकांना अभ्यासक्रम शिकवावा लागणार आहे.
हायटेक कारकुन काय कामाचे?
भारतीय लोक हे बुद्धिमत्तेत जगात अव्वल मानले जातात. परंतु सध्या शैक्षणिक गुणवत्ता पाहता हायटेक कारकुन तयार झाले आहेत. प्रत्येकाला 90 टक्मयांहून अधिक गुण असले तरी कौशल्य मात्र एकाही टक्मक्मयाचे नाही. यामुळेच देशातील बेरोजगारी वाढत गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांना यापुढे कौशल्याधारीत शिक्षणाची आवश्यकता भासणार आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शिक्षणाला कौशल्य व भारतील संस्कृतीशी जोडले गेल्याने याचे बदल पुढील काही वर्षात दिसून येतील.
कोरोनामुळे शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल झाले. ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना उदयाला आली. परंतु आजही ग्रामीण भागात नेटवर्क व मोबाईलची समस्या आहे. या विद्यार्थ्यांचा कोणीच विचार करण्यास तयार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकानीच पोहोचावे लागणार आहे. शिक्षकांनी आपल्या पेशाशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला डॉ. मुलीमनी यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात सेवंतीलाल शाह यांनी बदललेल्या शिक्षण व्यवस्थेविषयी माहिती दिली. नवनवीन अभ्यासक्रम आले, विद्यार्थ्यांची संख्या वाढली परंतु गुणवत्तेचं काय? गुणवत्ता वाढवायची असेल तर प्रत्येकानेच मेहनत घ्यावी लागेल. नविन ज्ञान आत्मसात करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थिनी रितीका मादार हिच्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. जीएसएस कॉलेजचे प्राचार्य बी. एल. मजूकर यांनी स्वागत केले. प्रा. अभय सामंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते वाय. के. प्रभू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. अनुजा नाईक यांनी केले. पी यू कॉलेजचे प्राचार्य प्रणव पित्रे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे सदस्य, आजी- माजी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.