इन्सुलीतील नारायण राणे यांनी केले वृद्धेवर अत्यसंस्कार,उत्तरकार्य : मुलगा दक्षिण आफ्रिकेत तर कुटुंबीय अडकले ‘रेड झोन’मध्ये
मयुर चराटकर / बांदा:
‘कोरोना’च्या संकटकाळात एकीकडे लॉकडाऊनमुळे सामान्य लोक घरातच अडकून पडले आहेत. दुसरीकडे आरोग्य यंत्रणा, पोलीस 24 तास सेवा देत आहेत. लॉकडाऊनमुळे जिल्हय़ाच्या सीमा बंद झाल्या आहेत. अशावेळी संकटात अडकलेल्यांसाठी अनेक हात पुढे येत आहेत. अशीच एक माणुसकीचा धर्म अधोरेखित करणारी कहाणी इन्सुलीत घडली. संकटकाळात नात्याला नाव नसते, याचा प्रत्यय या घटनेतून आला. या कहाणीचे हिरो आहेत, इन्सुलीचे माजी पंचायत समिती सदस्य नारायण ऊर्फ बबन राणे.
त्याचे घडले असे, इन्सुली क्षेत्रफळ येथे राहणाऱया गोपिका गोपाळ गावडे या वृध्देचे 88 व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. तिचा मुलगा केशव सध्या दक्षिण आफ्रिकेत राहत असून ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना अत्यसंस्कार करण्यास येणे शक्य नव्हते. तर तिचा नातू व सून डोंबिवली येथे रेड झोनमध्ये राहत असल्याने त्यांनाही अत्यसंस्कार करण्यास येणे शक्य नव्हते. त्यामुळे अत्यसंस्कार कोण करणार, असा पेचप्रसंग निर्माण झाला. त्यावेळी इन्सली गावात कोणाचेही निधन झाल्यास मदतीसाठी धावून जाणारे पंचायत समिती सदस्य नारायण ऊर्फ बबन राणे तेथे हजर झाले.
तोपर्यंत स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलीस पाटलामार्फत बांदा पोलिसांना दिली होती. तर तिचे येथे कोणी नसल्याने अत्यसंस्कार बाहेर करायचे, असे ठरविण्यात आले होते. मात्र, राणे यांनी तो निर्णय बदलण्यास सांगून तिचे अत्यसंस्कार आपण करू, अशी ग्वाही देत संपूर्ण उत्तरकार्य पार पाडले. एवढय़ावरच न थांबता आपल्याच घरातील कार्य समजून इतर विधीही पार पाडले. अस्थी विसर्जन, पिंडदान, केशार्पण विधीही केले. तिच्या बाराव्याचे कार्यसुद्धा ते करणार आहेत तसेच तिच्या स्मृतिप्रित्यर्थ गरजूंना धान्य वितरणही करणार आहेत. राणे यांच्या या माणुसकीच्या धर्माने गावकरीही गहिवरले.
मुलगा नोकरीसाठी परदेशात
गोपिका यांच्या पतीचे निधन मुलगा लहान असताना झाले. तिला एक मुलगी आहे. तिने कष्ट करून आपल्या दोघांनाही शिक्षण दिले. मुलगा केशव याचे प्राथमिक शिक्षण क्षेत्रफळवाडी येथे झाले. तर उर्वरित शिक्षण नातेवाईकाकडे राहून मुंबईत पूर्ण केले. मुंबई येथे एका खासगी कंपनीत काम करत असतांना त्यांना दक्षिण आफ्रिकेत त्याच कंपनीतून बढती मिळाली. त्यानंतर ते गेली 17 वर्षे तेथे राहत असून ते वर्षातून एकदा म्हणजे मे महिना किंवा गणपतीत इन्सुली येथे गावी येतात. तर त्याची पत्नी आणि मुलगा डोंबिवलीत राहत आहेत. त्या ठिकाणी कोरोनाबाधित क्षेत्र असल्याने रेड झोन जाहीर केला आहे. रेड झोनमुळे ते तेथून येऊ शकले नाही. तर पप्पा परदेशात असल्याने तेदेखील येऊ शकत नाहीत, या जाणीवेने त्यांच्यावर आभाळ कोसळले.
या प्रसंगी कुटुंबासमोर पेच असतांना बबन राणे यांनी आपण आईचे कार्य विधीवत करतो, असे दूरध्वनीवरून सांगितले. तुम्ही काळजी करू नका. मला ती भाचा म्हणायची. त्यामुळे मी कार्य करतो, असे स्पष्ट केले. राणे यांच्या या धीरामुळे गावडे कुटुंबासमोरील पेच सुटला.
तिच्या कष्टाची जाणीव…
गोपिका यांच्या पतीचे मुले लहान असताना निधन झाले. त्यानंतर तिने विडी वळत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मुलांना शिक्षण दिले. बालपणापासून त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती. तसेच आता त्यांची परिस्थिती चांगली असतानाही तिने कुटुंबासोबत न जाता गावी राहण्यास पसंती दिली. ती आपल्यालाही मुलाप्रमाणेच मानायची. त्यामुळे तिच्यावर अत्यसंस्कार करायचे ठरविले. आपण राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली. मुंबईत असताना आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी जी समाजकारणाची शिकवण दिली, तीच आचरणात आणल्याचे राणे यांनी सांगितले.