चार महिन्यानंतर शूटिंग सुरू : उद्यापासून मालिकेचे प्रसारण
वार्ताहर / सावंतवाडी:
आकेरी येथील अण्णा नाईक यांचा वाडा आता पुन्हा चार महिन्यानंतर गजबजला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे शूटिंग सुरू झाले आहे. ही मालिका 13 जुलैपासून नव्या वेळेत सुरू होत आहेत.
टीव्ही मालिका ‘कोरोना’मुळे बंद होत्या. आता पुन्हा नव्याने टीव्हीवरील मालिका 13 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यात ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचाही समावेश आहे. मार्च ते जून या कालावधीत लॉकडाऊनमुळे शूटिंग बंद असल्याने रामायण, महाभारत यांसह अन्य पौराणिक मालिकांकडे प्रेक्षकवर्ग वळला होता.
‘रात्रीस खेळ चाले’ टीमकडून सिंधुदुर्ग पोलिसांवर फिल्म
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या कलाकारांच्या टीमने सिंधुदुर्ग पोलिसांनी केरेना काळात केलेल्या कामगिरीवर छोटी फिल्म तयार केली आहे. सावंतवाडी बाजारपेठेत या फिल्मचे शूटिंग करण्यात आले. लवकरच ती प्रसारित होणार आहे. ‘कोरोना’च्या संकटाला न घाबरता धैर्याने त्याला हरवूया आणि पुन्हा जोमाने कामाला लागूया, असे या मालिकेत अण्णा नाईकची भूमिका करणारे माधव अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.
‘कोरोना’मुळे शूटिंग बंद होते. सर्व कलाकार घरीच होते. जूनपासून अनलॉक सुरू झाल्यानंतर शासनाने चित्रपट व मालिकांच्या शूटिंगला परवानगी दिली. त्यामुळे लॉकडाऊननंतर या ठिकाणी शूटिंग कसे असेल, हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.