जरारखान पठाण यांची माहिती : तहसीलदार कार्यालयासमोर होणार आंदोलन
प्रतिनिधी/ निपाणी
केंद्र सरकारने जारी केलेल्या एनआरसी व सीएए कायद्यामुळे देशभरात अराजकता निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात निपाणीत बुधवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक जरारखान पठाण यांनी दिली.
निपाणीत शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. पठाण पुढे म्हणाले, एनआरसी कायदा लागू केल्यामुळे मूलनिवासी बहुजन समाज अडचणीत येणार आहे. या कायद्यामुळे अनेकांच्या आरक्षणाचा हक्कही हिरावला जाण्याची शक्यता आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून या देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच या कायद्यामुळे विविधतेतून एकता या देशाच्या संकल्पनेला बाधा पोहोचणार आहे.
एका सर्व्हेनुसार देशात 42 कोटी लोकांकडेच आपला जन्मदाखला आहे. अजूनही लाखो लोकांकडे मतदार ओळखपत्र नाही. यात दलित, वंचित, आदिवासी यांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे अशा लोकांनाही एनआरसीमधून बाहेर पडण्याची भीती आहे. त्यामुळे याविरोधात बुधवारी देशभरात आंदोलन पुकारण्यात येणार आहे. निपाणीतही शांततामार्गाने आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र परवानगीऐवजी पोलिसांकडून आपल्यावरच दडपशाही सुरू आहे. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. जरी यावेळी बहुजन समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी अन्वर बागवान, गौस पठाण, कुतुबुद्दीन वठारे, हाजी इब्राहीम बागवान, शरीफ बेपारी, फारुख गवंडी, कुतुबुद्दीन हदाले, जावेद महात आदी उपस्थित होते.