खानापूर समितीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शिवस्मारकातील सभागृहात सोमवारी पार पडली. समितीच्या पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी पंधरा जणांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्ये÷ नेते देवाप्पा गुरव होते.
आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक करून वाटचालीबाबत निर्णय घेण्याच्या संदर्भात सूचना मांडण्याचे आवाहन केले. त्यानुसार समितीच्या कार्यकर्त्यांनी एकी कशी अभेद्य राहील व वाटचाल सुकर कशी होईल, या संदर्भात विचार मांडले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकीचे स्वागत केले. समितीच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांनी 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीतील अनामत रकमेबाबत जो वाद सुरू आहे तो लवकर मिटविण्यात यावा, अशी मागणी केली. याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
खानापूर तालुका म. ए. समितीची एकीनंतरची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मारुती प्रभाकर बोलताना म्हणाले, आपली युती नसून एकी आहे सीमाप्रश्न सोडून घेणे हे आपले ध्येय आहे. यासाठी कोणताही स्वार्थ न ठेवता खुल्या मनाने आपण एकत्र आलेलो आहोत, असे सांगितले.
दिगंबर पाटील यांनी, झाल्या गेल्या घटनांचा विचार करत बसण्यापेक्षा स्वार्थ बाजूला ठेवून त्यागाची भूमिका घेऊन समितीच्या झेंडय़ाखाली आले पाहिजे. अन्यथा येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही, असे सांगितले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी सूचना केल्या. विभागवार मेळावे घेण, सर्व विभागांना कार्यकारिणीत संधी देणे, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणे अशा विविध विषयांवर कार्यकर्त्यांनी विचार मांडले. या सर्वांचा विचार करून समितीच्या पुढील वाटचालीसाठी दोन अध्यक्ष, दोन कार्याध्यक्ष व इतर अकरा जण अशा पंधरा जणांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कमिटीला सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
यावेळी शंकर गावडे, सूर्याजी पाटील, सुधीर पाटील, वसंत नावलकर, धनंजय पाटील, राजाराम देसाई, विठ्ठल गुरव, अमृत पाटील, नारायण पाटील, अरुण देसाई, जयराम देसाई, रणजीत पाटील, संभाजी देसाई, गोपाळ देसाई यासह अनेकांनी विचार मांडले.
माजी आमदारांचे भाऊ समितीच्या ध्येयधोरणांशी बांधील
बैठकीत भाजपात प्रवेश केलेल्या आमदारांचे भाऊ सुधीर पाटील यांनी मराठी भाषिकांची माफी मागून आपण समितीच्या ध्येयधोरणांशी बांधील आहोत. समितीशी गद्दारी केलेल्यांना कधीच माफ करणार, नाही असेही ते म्हणाले तसेच तालुक्मयातील सर्व मराठी भाषिक जनतेने समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले. यावेळी ते अक्षरशः गहिवरले होते.