प्रतिनिधी/ सातारा
गेली 20 महिने सातत्याने कोरोनामुळे लॉकडाऊन अन् निर्बंध असेच सुरु आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून काहीसे खुले झाले होते. तोच पुन्हा कालपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन नियमावली राज्यभरात लागू केली आहे. त्यांच्या या नियमावलीमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून मैदाने आणि शाळा सुरु ठेवण्याची मागणी होवू लागलेली आहे. दरम्यान, जीमबाबतचा निर्णय बदलून थोडीसी मुभा दिल्याने जीम असासिएशनतर्फे समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यात सध्या कोरोना बाधितांचे आकडे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नव्याने निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध लागू केल्याने सातारकर जनतेतून त्यास विरोध होताना दिसत आहे. मैदाने जिह्यातील अद्याप बंद केलेली नाहीत. परंतु बंद केली तर सातारकरांना नुकतीच गेल्या तीन महिन्यापासून जराशी मोकळीक मिळू लागली आहे तीही बंद होण्यापूर्वीच सातारकरांनी त्यास विरोध केलेला आहे. मैदाने ही शारीरिक तंदूरुस्तीसाठी महत्वाची आहेत. जिम्स, मैदानांमध्ये सोशल डिस्टन्स पाळला जातो. नियम पाळले जातात. त्यावर निर्बंध म्हणून सातारकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तसेच शाळा बंदीबाबतही पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा जीमबाबत थोडेसे नियमात मुभा दिली गेली आहे. त्याबाबत साताऱयातील जिम चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चौकट पान 1
मुलांचे वाटोळे थांबवा
शाळा बंद करताना सरसकट बंद करण्याऐवजी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन व स्थानिक प्रशासनाला अधिकार देऊन निर्णय घ्यायला हवेत. वारंवार शाळा बंद करून आपण महासत्ता होण्यापासून अनेक वर्षे मागे जात आहोत. ज्या ठिकाणी कोरोनाचा कसलाच प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू ठेवण्यास परवानगी घ्यायला हवी. शाळाबंदी हे शिक्षणाचा अधिकार कायद्याचे सरळसरळ उल्लंघन नाही का?, मुलांना स्वतःचा आवाज नाही असे धोरणकर्त्यांनी गृहीत धरले असले तरीही याविरोधात पालकांनी का बोलू नये?. शाळा बंदीला विरोध म्हणजे मुलांचे वाटोळे थांबवावे, अशी एका पालकांने आपली प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
शासनाने निर्णय बदलल्याबाबत आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेबांनी काल जीम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज निर्णयामध्ये बदल करुन शिथिलता आणली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आम्हा जीम चालकांकडून सर्व नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येते. जीम चाललली तर व्यायाम होईल, व्यायाम झाला तर तंदूरुस्ती राहील.
किशोर बाबर, जिम असोसिएशन सचिव
जिममध्ये नियम पाळले जातात
सातारा शहरातील सर्व जिम चालक, मालक आपल्या जीममध्ये नियम पाळले जातात. जिल्हाधिकाऱयांनी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यांचे पालन केले जाते. आमच्याकडून कोणत्याही नियमांचे उल्लघंन होत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी सवलत दिली त्याबाबत त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो.
नवनाथ साळुंखे, जीम ऍण्ड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष
शासनाचा निर्णय चुकीचा आहे.
शासनाने काढलेला निर्णय चुकीचा आहे. तिकडे थिएटर चालू, शुटींग चालू, सगळे चालू आहे. आज लहानमुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांना व्यायामाची नितांत गरज आहे तिथे कुठल्याही प्रकारचे सामुहिक असे नसते. तरीही शासनाने संकुले बंद केली हा शासनाचा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे. इतर ठिकाणी दहा दहा, वीस वीस माणसे एकत्र येतात. क्रिडांगणाला काय अडचण आहे. आज ज्येष्ठांची अडचण आहे. पोलीस भरतीसाठी मुलं प्रॅक्टीस करतात. त्यांनी कुठं प्रॅक्टीस करायचे. अशा वेळेला शासनाला मी विनंती करतो की मैदाने खुली करा. आज वृद्ध, ज्येष्ठ नागरिक चालण्यासाठी बाहेर येत आहेत. कृपया क्रिडांगणे सुरु करा.
वैभव फरांदे, जेष्ठ नागरिक
मैदाने सुरु करण्यात यावीत
व्यायामाची गरज आपल्याला आहे. सकाळी आणि संध्याकाळी मैदाने खुली ठेवणे मला गरजेचे वाटते. जेणेकरुन लोकांचे आरोग्य चांगले राहिल. रोगप्रतिकार शक्ती चांगली राहिल. कोरोनाचे जे व्हायरस रोखण्यामध्ये काहीसे सहकार्य होईल. त्यामुळे मैदाने सुरु करण्यात यावीत.
किरण गायकवाड, खेळाडू
खेळाने इम्युनिटी पॉवर वाढते
शासनाने खेळाची मैदाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. परंतु आज मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल तर त्यांना मैदानी खेळ आणि व्यायामाची नितांत गरज आहे. त्याकरता मैदाने सुरु ठेवले गेले पाहिजेत असे आमचे म्हणणे आहे.
विकास जगदाळे, खेळाडू