प्रतिनिधी/ चिपळूण
निसर्ग चक्रीवादळातील नुकसान भरपाई देण्यास उशीर झाला हे मान्य आहे, पण रक्कम वाढवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याने हा विलंब झाला आहे. सुपारीला पन्नास रुपये, नारळाला 250 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसांत भरपाई रकमेचे वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती फलोत्पादन राज्य मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी येथे दिली.
उत्तर रत्नागिरी दौऱयावर आलेल्या तटकरे यांनी शनिवारी चक्रीवादळातील नुकसान व कोरोनास्थितीचा अधिकाऱयांकडून आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, यापूर्वी जुन्या निकषानुसार हेक्टरी 18 हजार 500 रूपये नुकसानग्रस्तांना दिले जात होते. मात्र ही मदत वाढवून ती हेक्टरी 50 हजार करण्यात आली आहे. सुपारी, नारळ यांना प्रतीझाड मदत देण्याचाही निर्णय झाला आहे. येत्या पंधरा दिवसांत त्याचे वाटप केले जाणार आहे. केंद्र सरकार पश्चिम बंगाल अथवा दक्षिण भारतात ज्याप्रमाणे मदत वाटप करते त्याप्रमाणे निसर्ग चक्रीवादळात महाराष्ट्राला मदत करावी अशी आम्ही विनंती केली होती. मात्र केंद्राकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
क्वारंटाईन कालावधीचा निर्णय लवकरच
गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण असल्याने चाकरमानी मोठय़ासंख्येने कोकणात येणार आहेत. चाकरमान्यांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे व साध्या पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा अशी शासनाची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे आपले हाल झाले त्याचप्रमाणे चाकरमान्यांचेही मुंबईत गेल्या तीन-चार महिन्यांपासून झाले आहेत. त्यांची मोठी फरफट झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना कसल्याहीप्रकारचा त्रास न होता यावेळी गणेशोत्सवाला कोकणात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. चाकरमान्यांना कोकणात आणताना क्वारंटाईन कालावधी किती असेल, त्यासाठीची नियमावली काय असेल, याबाबतचा निर्णय पुढील आठवडय़ात होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार रमेश कदम, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खाताते, जिल्हा परिषद माजी सदस्य अजय बिरावटकर, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, नितीन ठसाळे, अशोक कदम, शहराध्यक्ष दीपिका कोतवडेकर, सीमा चाळके, योगेश शिर्के, रियाज खेरटकर, मयुर खेतले, स्वप्नील शिंदे उपस्थित होते