प्रतिनिधी/ पणजी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात 26 नोव्हेंबर 2008 रोजी शहीद झालेल्यांना पणजी येथील आझाद मैदानावर होणाऱया विशेष कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात येणार असून यात राज्यातील अनेक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेने 26 रोजी पणजी येथील आझाद मैदानावर सायं. 5 वा. मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी ‘जरा याद करो कुर्बानी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आझाद मैदानावर पणत्या पेटवून आणि हुतात्मा स्मारकावर फुले वाहून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. पाकिस्तानने आजही दहशतवादाला खतपाणी घालणे सुरूच ठेवले असून भारतीय त्याचा बिमोड करून पाकिस्तानला धडा शिकविण्यास सक्षम आहेत. पाकिस्तानने त्याचा अनुभव घेतला आहे. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे बंद केले नाहीतर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागल्याशिवाय राहणार नाही.
जरा याद करो कुर्बानी कार्यक्रमात माजी सैनिक कल्याण मंडळाचे सचिव मेजर वेणुगोपाल नायर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पणजी मनपा, गुज, सम्राट क्लब पणजी, रोटरी क्लब पर्वरी, रोटरी क्लब मिरामार, लायन्स क्लब पणजी, यूथ हॉस्टेल मिरामार, गोवा असोसिएशन, जय हिंद फाऊंडेशन या संघटना सहभागी होणार आहेत अशी माहिती अनंत जोशी यांनी दिली.