प्रतिनिधी/ रत्नागिरी
अपुऱया मनुष्यबळामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांनी आंदोलनाचा इशारा दिलेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पद भरतीसाठी 4 ऑगस्टला काम बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कर्मचाऱयांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.
शुक्रवारी परिचारिका संघटनेने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाची नोटीस दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरी येथे 63 नियमित अधिपरिचारिका, 33 बंधपत्रित अधिपरिचारिका, 16 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तसेच कोविड अंतर्गत 3 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर 6 अधिपरिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंधपत्रित 33 अधिपरिचारिकांपैकी 16 अधिपरिचारिकांचा करार हा पुढील 15 दिवसांच्या कालावधीत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर अधिकचा ताण येणार आहे.
प्रत्यक्षात पुढील 15 दिवसात पद भरती न झाल्यास 102 अधिपरिचारिका कार्यरत असतील. सर्व नियमित व बंधपत्रित अधिपरिचारिका या कोविड -19 मध्ये काम करत आहेत. वॉर्डमध्ये 8 तास व अतिदक्षता विभाग यामध्ये 6 तासाची शिपमट डय़ुटी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे 7 दिवसांचे चक्राकार पध्दतीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. कोरोना योध्दा ही उपाधी मिरवत सर्व अधिपरिचारिका जीवाची पर्वा न करता विपरित परिस्थितीत काम करत आहेत. सुमारे 20 अधिपरिचारिकांना कोरोना संसर्ग झाला आहे. तरीही मनोधैर्य उंचावून सर्व अधिपरिचारिका काम करत आहेत.
कोरोनाची साथ केव्हापर्यंत आटोक्यात येणार, या बाबत अनिश्चितता आहे. आजपर्यंत रत्नागिरी जिह्यात एकूण बाधित रुग्ण 1691 त्यापैकी बरे झालेले रुग्ण 1102 इतके आहेत. बाधित रुग्णांना अखंडित सेवा देताना त्यांना बरे करण्यात अधिपरिचारिका यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्यक्षात 450 अधिपरिचारिका यांची नियुक्ती होणे आवश्यक असताना 102 परिचारिका काम करत आहेत. याच अधिपरिचारिकांना नॉन कोविड विभागाचीही कामे करावी लागत आहेत.
अपुऱया अधिपरिचारिका संख्येमुळे कार्यरत अधिपरिचारिकांच्या शारीरिक क्षमतेवर विपरित परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे रुग्णसेवा देताना रुग्णांचा रोषही सहन करावा लागत आहे. कोरोनाबाधित झाल्यानंतर राहत्या ठिकाणी, गावात व समाजात अपराधीपणाची वागणूक सहन करावी लागत आहे. रुग्णखाटांच्या संख्या वाढवतानाच उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करावा अन्यथा अधिपरिचारिका यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात आल्यास रुग्णसेवेची व्यवस्था कोलमडून पडेल, अशी स्थिती आहे. परिचारिकांच्या भरतीसाठी 4 ऑगस्टला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा एस. एस. बने यांच्यासह पदाधिकाऱयांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.