“आपलं परंपरा खंडित झालं नाय पाहिजे,’’ पेपर वाचता वाचता नाग्या म्हणाला. हरिदास, नाग्या आणि मी आमच्या घरी पेपर वाचता वाचता चहा घेत होतो. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आम्ही ठरवलंय. रोज तिघांनी घराबाहेर पडण्याऐवजी एकाने बाहेर पडून तिघांना लागणारी वर्तमानपत्रे, दूध, भाज्या वगैरे वस्तू आणायच्या, त्याच्या घरी तिघांनी चहा घ्यायचा… सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी व्हायला किंचित हातभार. आज माझी खेप होती.
“काय झालं नाग्या? कसली परंपरा?’’
“आपलं प्रत्येक सणाचं परंपरा रे. म्हणजे उदाहरणार्थ रंगपंचमी, आषाढीचं वारी, राखी पौर्णिमा, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत वगैरे. सगळं सण.’’
“पण आता कोरोनाचं संकट आलंय. तुला आपल्या धर्माचा अभिमान वाटतो की नाही?’’
“होय तर.’’
“मग मला सांग. कोरोनाची साथ असताना प्रत्येक सणाचं निमित्त करून सार्वजनिक ठिकाणी आपण गर्दी केली आणि लागण पसरली तर मृत्यूमुळे आपल्याच धर्माच्या लोकांची संख्या कमी होईल की नाही? सणांवर ज्याचं अर्थकारण चालतं अशी कोटय़धीश व्यावसायिक माणसं आपापल्या आलिशान बंगल्यात बसून सामान्य माणसाला परंपरेच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी गर्दी करायला चिथावणी देतात. कारण त्यांचा माल खपला पाहिजे. आपण त्यांच्या नादी लागायचं का? यंदा लाखो वारकऱयांनी घरातूनच विठ्ठलाला नमस्कार केला. काही नुकसान झालं का त्यांचं? उलट अनेकांचे जीव वाचले.’’
माझ्या बोलण्यावर नाग्या काही क्षण निरुत्तर झाला. पण हरिदास त्याच्या मदतीला आला, “आपले पूर्वज वेडे नव्हते. त्यांनी या सणांना ज्या परंपरा जोडल्या आहेत त्यामागे शुद्ध वैज्ञानिक दृष्टी आहे. मी तर म्हणतो, त्यांना कोरोनाबद्दल देखील माहिती असणार. कोरोनाच्या साथीत त्यांनी प्रत्येक सण शास्त्रशुद्धरित्या साजरे केले असतील.’’
“कशावरून?’’
“सांगतो. रंगपंचमीच्या वेळी त्यांनी पिचकारीत रंगीत सॅनिटायझर वापरलं असेल. वारीच्या वेळी रोज स्नान केल्यावर वारकरी सर्वांगाला सॅनिटायझर लावत असतील. प्रत्येक सणाच्या, मिरवणुकीच्या वेळी कोरोनाला पळवण्यासाठी गुलाल, बुक्का, रांगोळी वगैरेत सॅनिटायझरचे चूर्ण मिसळले असेल. सॅनिटायझरमध्ये भिजवलेली राखी, आपटय़ाची पाने वापरून सण साजरे केले असतील. फाल्गुनात लाकडांऐवजी वापरलेली पीपीई किट्स वगैरेची होळी केली असेल.’’ “व्हॉट्सअप विद्यापीठ काय रे?’’ मी विचारल्यावर हरिदास जाम लाजला.