दहावीच्या परीक्षेबाबत आग्रही मागणी : सर्व काही सुरु झाले, परीक्षाच का नको : मुलांच्या मानसिकतेचा विचार व्हावा
प्रतिनिधी / पणजी
दहावीची परीक्षा दुसऱयांदा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे परीक्षार्थी तसेच त्यांचे पालक, शिक्षणक्षतज्ञ नाराज झाले असून निर्णयाचा फेरविचार करावा आणि परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी पुढे आली आहे. लॉकडाऊन असतानाही सर्व व्यवहार सुरु झालेत, मग परीक्षाच का नको, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एकंदरीत परिस्थितीत एक तर परीक्षा रद्दच करावी किंवा ती विद्यार्थ्यांच्या शाळेतच घ्यावी, आणि शक्य तेवढी लवकर घ्यावी, अशी मागणी काल मंगळवारी पुढे आली आहे.
कोरोनाबाबत गोवा हरित विभागात आल्यानंतर लॉकडाऊन असूनही शिथिलता मिळाल्याने सर्व व्यवहार सुरु झालेले आहेत. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशा परिस्थितीत दहावीच्या परीक्षांचा विषय मोठय़ा गांभीर्याचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’ने शिक्षणक्षेत्रातील अनेकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘एक तर परीक्षा रद्दच करा, अन्यथा ती विद्यार्थ्यांच्या शाळेतच आणि तिही त्वरित घ्यावी’, अशी मागणी पुढे आली आहे.
सर्व हवे, मग परीक्षाच का नकोत : ढवळीकर
फोंडा येथील शिक्षणतज्ञ गो. रा. ढवळीकर यांनी परीक्षा पुढे नेण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले असून लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार सुरू झाले, मग परीक्षा का होत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. सरकारने व गोवा बोर्डाने परीक्षांच्या तारखा त्वरित जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. परीक्षा घेणे शक्य नसेल तर दहावी परीक्षा रद्द करून वार्षिक सरासरीवर आधारित निकाल देण्याचा पर्याय निवडावा, असेही त्यांनी सूचविले आहे.
परीक्षा पुढे ढकलतच राहणार काय?
दहावी परीक्षा पुढे गेल्याने मुलांची, पालकांची घोर निराशा झाली असून त्यांची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. त्यातून सुटका व्हायची असेल तर परीक्षा तातडीने घेण्याची गरज आहे. त्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत थांबण्याची गरज नाही. भविष्यात लॉकडाऊन वाढत राहिले तर परीक्षा पुढे ढकलत राहणार काय? असाही प्रश्न ढवळीकर यांनी विचारला आहे.
शिक्षण, परीक्षा हा राज्य सरकारचा विषय
शिक्षण व परीक्षा हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असून तो केंद्रावर ढकलता येणार नाही. गोवा ग्रीन झोनमध्ये आहे आणि राष्ट्रीय लॉकडाऊन असतानाही गोव्यात सर्व व्यवहार सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मग मुलांच्या परीक्षांचा विचार का होत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
अभ्यास करून मुले आता कंटाळली
अभ्यास करून करून मुले आता कंटाळली असून परीक्षा कधी होतात याची वाट पहात आहेत. त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी परीक्षा त्वरित घेणे हाच योग्य मार्ग व पर्याय आहे. मार्गदर्शक तत्त्वे पाळून परीक्षा घेणे शक्य आहे आणि अवघड नाही असेही मत त्यांनी प्रकट केले.
मुलांच्या शाळेतच परीक्षा घ्यावी : नाडकर्णी
विद्यमान परिस्थितीत दहावीची परीक्षा रद्द करावी. नववी, दहावीच्या आतापर्यंतच्या परीक्षेतील सरासरी, सांखिकी पद्धतीने निकाल देण्यात यावा तथापि त्यासाठी गोवा बोर्डाने थोडा अभ्यास करावा असे स्पष्ट मत बोर्डाचे माजी अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यांनी प्रकट केले आहे. ते जर शक्य होत नसेल तर मुलांच्या शाळेतच त्यांच्या परीक्षा घेऊन मोकळे करावे, असा दुसरा पर्याय नाडकर्णी यांनी सुचवला आहे.
पावसाळा, वादळाचा धोकाही संभवतो
परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याने मुलांवर मानसिक ताण वाढत असून त्यातून सुटका होण्याची वाट ते पाहत आहेत. लॉकडाऊन आहे म्हणून परीक्षा पुढे ढकलत ढकलत त्या जूनमध्ये घेणे सोयीस्कर नाही. कारण उकाडा वाढत आहे आणि पाऊस वादळाचा धोकाही संभवतो, म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी रद्दच करा असे नाडकर्णी यांनी नमूद केले.
परीक्षा जर रद्द केल्या तर गुणपत्रिका, निकाल कसा ठरवायचा याचा अभ्यास करूनच तो निर्णय घेणे श्रेयस्कर आहे. त्यासाठी प्रयोग म्हणून काहीजणांचा गुणांचा तपशील घेवून अभ्यास करून गुणपत्रिका करावी. ती योग्य व अन्यायकारक ठरणार नाही याची खात्री करूनच पुढे जावे असे नाडकर्णी म्हणाले.
परीक्षा रद्द करणेच योग्य ठरणार : सुरेंद्र सिरसाट
दहावीच्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. या परीक्षेची जीवनात कोणतीच आवश्यकता नाही. अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश देण्यासाठी मात्र उच्च माध्यमिक विद्यालयांनी प्रवेश परीक्षा ठेवाव्यात, अशी प्रतिक्रिया प्रा. सुरेंद्र सिरसाट यांना व्यक्त केली.
अकरावी विज्ञान शाखेसाठी प्रवेश परीक्षा घ्यावी
दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करावे. अकरावीचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू करावे. कला, वाणिज्य शाखेला प्रवेश परीक्षा घेण्याची आवश्यता नाही. ज्यांना विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी अर्ज भरावा व प्रवेश परीक्षा द्यावी. उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश देण्यात यावा, असा उपाय सिरसाट यांनी सूचविला आहे.
परीक्षा घ्यायच्याच झाल्या तर त्या वेगवेगळ्या केंद्रात न घेता त्या त्या शाळेतच घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये, आणि त्या परीक्षा त्वरित घ्याव्यात, असे त्यांनी सांगितले.
परीक्षा घेतलीच पाहिजे : दीपक आमोणकर
दहावीच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत. त्या नाही घेतल्या तर सतत अभ्यास करणारे विद्यार्थी तणावग्रस्त होणार, अशी प्रतिक्रिया डॉ. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालाचे प्राचार्य दीपक आमोणकर यांनी व्यक्त केली. फक्त तीन दिवसात परीक्षा पूर्ण केली जाऊ शकते. विज्ञान, गणित आणि इंग्रजी अशा तीनच विषयाची परीक्षा घ्यावी. जेणेकरून अकरावीला प्रवेश देणे सोपे जाईल, असे ते म्हणाले.
गोवा ग्रीन झोनमध्ये आहे. त्याचा फायदा घेऊन प्रिलिम्सप्रमाणे त्या त्या शाळांतच परीक्षा उरकण्याची संधी घ्यावी. सकाळी व सायंकाळी पेपर घेऊन तीन दिवसात परीक्षा पूर्ण करता येते, असेही ते म्हणाले. उत्तर पत्रिका तपासणीसाठी त्या शिक्षकांच्या घरोघरी पोहोचव्यात आणि त्या जमा करण्याची जबाबदारी शालांत मडंळाने घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.
दहावीच्या परीक्षेचे नक्की भवितव्य काय? आतापर्यंत दोनवेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून तिसऱयावेळीही ती पुढे ढकलली जाणार नाही, असे छातीठोकपणे सांगण्याचीही परिस्थिती नाही. दहावीची मुले गेल्या वर्षभराहून अधिक काळ अभ्यास करत आहेत. सध्या परीक्षेच्या काळजीबरेबरच उकाडय़ानेही मुले हैराण झालेली आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार गांभीर्याने व्हायला हवा, पुढे पावसाळाही सुरु होणार आहे, या सर्वांबाबत चिंता व्यक्त करणारा स्पष्ट मतप्रवाह सध्या राज्यात सुरु आहे. दहावीच्या परीक्षेचे नक्की भवितव्य काय, असे प्रश्नचिन्ह निमार्ण झाले आहे.