वार्ताहर/ एकसंबा
मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह चिकोडी आणि निपाणी तालुक्यात जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची धांदल उडाली होती. तोंडाशी आलेले पीक जोरदार पावसाने वाया जाणार असल्याने शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे. या अस्मानी संकटाच्या मालिकेत शेतकरी अडकला आहे. जवळपास तीन तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असल्याचे गेल्या काही दिवसापासून पहावयास मिळत होते. चार दिवसांपासून वातावरणात कमालीची उष्णता निर्माण झाली होती. तीन दिवसापूर्वी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरात पाऊस झाला होता. यानंतर मंगळवारी सायंकाळीही पाऊस पडण्याची चिन्हे होती. रात्री साडेआठच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस जवळपास तीन तास कोसळत होता. या पावसामुळे गटारी, छोटे-मोठे नाले भरून वाहत होते तर काही शाळांच्या मैदानाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सोयाबीन, भुईमूग पिकाचे नुकसान
पावसाळय़ाच्या सुरुवातीला शेतकऱयांनी सोयाबीन, भुईमूग, उडीद या पिकांची पेरणी केली होती. सध्या सोयाबीन व भुईमूग काढले जात आहे. पण मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे सोयाबीन व शेंगा पिकाला मोठा फटका बसला आहे. काहींची सोयाबीन पिकाची रास सुरू असून काहींनी सोयाबीन काढणी सुरुवात केली होती. अशावेळी जोरदार पाऊस पडल्याने शेतात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे काढणी व मळणी करण्याच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. काहींच्या शेंगा बाद होण्याच्या स्थितीत असल्याचेही शेतकऱयांनी सांगितले आहे.