कचरा टाकणाऱयांवर कडक कारवाई होण्याची गरज : ग्रामपंचायतीने तोडगा काढण्याची मागणी
वार्ताहर / किणये
पिरनवाडी येथे कचऱयाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. पिरनवाडी गावच्या काही ठिकाणी कचऱयाचे ढिगारे निदर्शनास येत आहेत. या कचऱयाच्या आजूबाजूला दुर्गंधी पसरत असल्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कचऱयाची समस्या सुटणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.
बेळगाव-चोर्ला रोडवर पिरनवाडी नाल्याजवळ नेहमीच कचऱयाचा ढिगारा साचलेला असतो. या ठिकाणी दुर्गंधी येत असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांना त्रास होऊ लागला आहे. पिरनवाडी ग्रामपंचायतीमार्फत काही वेळा कचऱयाची साफसफाई केली जाते. तरीही काही नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी कचरा आणून टाकतात. कचरा टाकणाऱयांवर ग्रा. पं. ने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अलीकडे पिरनवाडी गावचा विस्तार झपाटय़ाने वाढला आहे. मच्छे औद्योगिक वसाहत, व्हीटीयू, विविध शाळा, कॉलेज हे पिरनवाडी परिसरात आहेत. त्यामुळे बाहेरगावातील नागरिकही या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. पिरनवाडीत विविध प्रकारची दुकाने आहेत. या दुकानांमध्येही वाढ झाली आहे. दुकानातील टाकाऊ केरकचरा या ठिकाणी टाकण्यात येत आहे. तसेच चिकन व मटण दुकानातील टाकाऊ पदार्थ या नाल्याच्या बाजूला टाकण्यात येतात. काही जण तर रात्रीच्या वेळी कचरा पोत्यात भरून अंधाराचा फायदा घेऊन या नाल्याच्या बाजूला फेकतात. यामुळे दिवसेंदिवस कचऱयाच्या ढिगाऱयामध्ये वाढ होतानाचे चित्र पहावयास मिळते.
आठ दिवसांपूर्वीच साफसफाई
गेल्या आठ दिवसांपूर्वीच या ठिकाणची साफसफाई करण्यात आली होती.त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होऊ लागली असल्यामुळे यावर अंकुश ठेवणार कोण? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. या परिसरात शाळा-कॉलेज असल्यामुळे विद्यार्थिही या ठिकाणाहून ये-जा करीत असतात.
त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कचऱयाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पालकवर्गातून होत
आहे.
पिरनवाडी नाल्यासह बेळगाव-पणजी महामार्गावरील पिरनवाडी नाक्मयाजवळ, तसेच मच्छे रस्त्याच्या बाजूला, हुंचेनहट्टी रोड येथील जैन कॉलेजच्या बाजूला नेहमीच कचऱयाचे ढिगारे साचलेले असतात.
मच्छे व पिरनवाडीतील कचऱयाची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पिरनवाडी नाल्याजवळील कचऱयाच्या ठिकाणी मृत पावलेली जनावरे आणून टाकण्याचे प्रकारही यापूर्वी झालेले आहेत.
सामाजिक जाणिवेची गरज
कचरा टाकणाऱयांनीही सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. प्रशासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. मात्र, मच्छे-पिरनवाडी परिसरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱयामुळे या ठिकाणी स्वच्छता मोहीम होते की नाही, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी कचराकुंडी निर्माण करण्याची गरज आहे. तसेच घरोघरी जाऊन कचरा जमा करणेही आवश्यक आहे.