रेल्वे सुरू करण्याची सिटीझन्स कौन्सिलची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील 9 महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. बेळगाव हे व्यापारी शहर असल्यामुळे जिल्हय़ातून नागरिक शहरात येतात. शिक्षण, व्यापार, उद्योग, शेती माल यासह इतर कामांसाठी दररोज बेळगावला येणाऱयांचे पॅसेंजरअभावी हाल होत आहेत. खासगी वाहनचालकांकडून त्यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे त्वरित हुबळी ते मिरज या दरम्यान पॅसेंजर रेल्वे सुरू करावी, अशी मागणी सिटीझन्स कौन्सिलने रविवारी रेल्वे विभागाकडे केली.
बेळगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर एस. गिरीष यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी रेल्वे विभागाने मार्च महिन्यापासून पॅसेंजर रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे पॅसेंजर सुरू करण्यास कोणतीच हरकत नसल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
गोकाक, रायबाग, चिकोडी, घटप्रभा, अळणावर, लोंढा, खानापूर या परिसरातून दररोज शेकडो नागरिक बेळगावमध्ये कामानिमित्त येतात. महाविद्यालये सुरू झाली असून, विद्यार्थी शिक्षणासाठी बेळगावमध्ये येत आहेत. परंतु पॅसेंजर रेल्वे नसल्यामुळे त्यांना बसने अथवा खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागत आहे. 25 ते 30 रुपयात जो प्रवास होणार होता तो आता 70 ते 80 रुपये देऊन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गरज ओळखून नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-मिरज, कॅसलरॉक-मिरज, लोंढा-मिरज, बेळगाव-मिरज, हुबळी-मिरज या पॅसेंजर रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
बेळगाव-रामनगर या रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. अळणावर, रामनगर, कॅसलरॉक या परिसरातील प्रवाशांना कामानिमित्त बेळगावला यायचे असेल तर रेल्वे हा पर्याय सोयीचा ठरतो. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे नैर्त्रुत्य रेल्वे विभागाकडे केली आहे.
स्टेशन मास्तर एस. गिरीष यांनी निवेदन स्वीकारून हुबळी येथील विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी सिटीझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सदस्य सेवंतीलाल शाह, अरुण कुलकर्णी, विकास कलघटगी, निवृत्त रेल्वेमास्तर एस. सुरेश, बेळगाव बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष एन. आर. लातूर उपस्थित होते.