क्षमा मागण्यास भूषण यांचा नकार, निर्णयाकडे लक्ष
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी वकील प्रशांत भूषण यांना कोणती शिक्षा द्यावी, या संबंधींचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. मंगळवारच्या सुनावणी प्रसंगी भूषण यांनी क्षमा मागण्यास नकार दिल्याने आता न्यायालय कोणती भूमीका घेणार याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे.
निर्णय राखून ठेवण्यापूर्वी न्या. अरूण मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने भूषण यांना क्षमा याचना करण्याची तसेच झाल्या प्रकरणी खेद व्यक्त करण्याची आणखी एक संधी दिली. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर पुनर्विचार करण्यासाठी त्यांना आणखी 30 मिनीटांचा वेळ देण्यात आला. यापूर्वी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. तथापि, भूषण यांनी भूमिका न बदलल्याने निर्णय राखून ठेवण्यात आला.
भूषण यांना शिक्षा ठोठावण्यात येऊ नये. शिक्षा ठोठावल्यास त्यांचे महत्व वाढेल. त्यांना विनाकारण ‘हौतात्म्य’ प्राप्त होईल. त्यामुळे त्यांना क्षमा करण्यात यावी, अशी विनंती सरकारचे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी केली. मात्र, न्यायालयाने तसे आश्वासन दिले नाही. भूषण हे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकील आहेत. ते जेव्हा न्यायालयासंबंधी अशा प्रकारची दुर्दैवी भाषा उपयोगात आणतात, तेव्हा, न्यायालय या संस्थेसंबंधी लोकांना काय वाटेल याचा विचारही केला पाहिजे. हा प्रश्न एका व्यक्तीचा नाही. तो सर्वोच्च न्यायालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेशी संबंधित आहे. त्याचा विचार गंभीरपणेच केला पाहिजे, असे न्यायालयाने सुनावले.
क्षमा मागण्यास अडचण कोणती ?
भूषण यांनी भारतातील लोकशाही गेल्या सहा वर्षांमध्ये उध्वस्त झाली आहे, आणि या उध्वस्तीकरणात सर्वोच्च न्यायालयाचे गेले चार सरन्यायाधीश समाविष्ट आहेत असा अर्थाचे ट्विट केल्याने हा वाद उफाळून आला होता. हे विधान गंभीर आहे. तरीही आम्ही भूषण यांना क्षमा याचनेसाठी वेळ दिला. क्षमा मागण्यास अडचण कोणती आहे ? असाही खोचक प्रश्न न्यायालयाने विचारला.