नियमित शेती कर्जफेड करणारे शेतकरी अडचणीत : ऑक्टोबरपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळेल – सतीश सावंत : व्याजाची रक्कम थेट : शेतकऱयांच्या खाती जमा होणार
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
महाआघाडी शासनाने शेतकऱयांचे शेती कर्ज माफ करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेत कार्यवाहीही सुरू केली. मात्र, त्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱयांना द्यायच्या प्रोत्साहन भत्याबाबतचा निर्णय होऊनही कोरोनामुळे कार्यवाही झाली नाही. परिणामी 50 हजारापर्यंतचे कर्ज प्रोत्साहन भत्त्यातून माफ होण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱयांना ही रक्कम व्याजासह भरणे नशिबी आले आहे. कारण वर्षभरासाठी बिनव्याजी मिळणाऱया कर्जाच्या रकमेवरील व्याज शासनाकडून बँक, सोसायटय़ांना मिळत होते. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार हे व्याज शेतकऱयांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याने सोसायटय़ांनी सहा टक्के व्याजासह रक्कम भरून घेण्यास सुरुवात केली. नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहन भत्ता, व्याजाची रक्कम मिळणार हे जरी खरे असले, तरीही अगोदरच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱयांना कर्जफेड करताना अशा नवीन अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
विद्यमान शासनाने दोन लाखांपर्यंतचे शेतकर्ज माफ करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आणली. या योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्यांचे कर्ज माफ करण्याबाबत कार्यवाही झाली, तर अर्ज भरलेल्या उर्वरितांची कार्यवाही सुरू आहे. मात्र, या योजनेत नियमित कर्जफेड करणारे शेतकरी मात्र पुरते अडचणीत आल्याचे दिसत आहेत.
प्रोत्साहन भत्ता मिळणार
याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. शासनाने तसा निर्णयही घेतला आहे. मात्र, साधारणत: ऑक्टोबर महिन्यापर्यंत याबाबत कार्यवाही होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नवीन कर्ज घेण्यासाठी संबंधित शेतकऱयांना मूळ कर्जाची रक्कम भरून नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. मात्र, 50 हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता संबंधितांना मिळणार आहे.
व्याजासह रक्कम
शेतीकर्ज योजनेंतर्गत 365 दिवसांसाठी शेतकऱयांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम विना व्याज मिळत होती. त्यानुसार शेतकरी कर्ज घेत त्याची परतफेड करत होते. मात्र, यावर्षी कर्जमाफी योजनेत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज प्रोत्साहन भत्त्याच्या माध्यमातून माफ होणार असल्याने अगदी 20, 25 हजारपासून लाखापर्यंत कर्ज घेणारे शेतकरी या माफीची वाट पाहत बसले. मात्र, त्यांना शेतीसाठी आता पुन्हा कर्ज हवे असल्याने त्यांना मूळ कर्जाची रक्कम भरणे अनिवार्य आहे. शेतकरी ही रक्कम भरणा करण्यासाठी संबंधीत सोसायटय़ांमध्ये गेले असता कर्ज रकमेवर सहा टक्के व्याजासह रक्कम भरणा करून घेण्यात येते. एकीकडे प्रोत्साहन भत्ता नसताना दुसरीकडे व्याजही भरावे लागत असल्याने कोरोनाच्या संकटाचा सामना करताना शेतकऱयांना या नवीन अडचणींचा सामना करावा लागत आहे.
व्याज शेतकऱयांच्या खात्यात
शेतकऱयांकडून व्याज भरणा करून घेण्यात येत असल्याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, या सहा टक्के व्याजाच्या रकमेमध्ये तीन टक्के केंद्र व तीन टक्के राज्य शासनाचा वाटा आहे. पूर्वी ही रक्कम सोसायटय़ांना देण्यासाठी बँकेला मिळत असे. कर्ज सोसायटय़ांकडून देण्यात येत असल्याने व सोसायटय़ांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बँक त्यांना ‘स्व फंडातून’ ही रक्कम देत असे व शासनाकडून व्याजाची रक्कम मिळाल्यावर स्व फंडात ठेवत असे. मात्र, केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार आता ही व्याजाची रक्कम शेतकऱयांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. त्यामुळे सोसायटय़ांनी कर्ज भरून घेताना सहा टक्के व्याजाची रक्कम न घेतल्यास सोसायटय़ा अडचणीत सापडतील. कारण नंतर व्याजाची रक्कम शेतकऱयांना थेट मिळणार असल्याने ती सोसायटय़ांना मिळणार कशी? त्यामुळे कर्जफेड करताना व्याजासह कर्ज भरून घेतले जात असल्याचे सावंत म्हणाले.
शेतकऱयांच्या खाती रक्कम केव्हा जमा होणर?
जिल्हा बँकेने स्व फंडातून सन 18-19 साठी या व्याजाच्या रकमेपोटी सुमारे तीन कोटी रुपये सोसायटय़ांना दिलेले आहेत. ही रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. तर नाबार्डच्या सूचनेनुसार यापुढे व्याजाची रक्कम थेट शेतकऱयांच्या खात्यात जाणार असल्याने सोसायटय़ांकडून व्याज आकारणी सुरू आहे. या एकूण स्थितीचा विचार करता शेतकऱयांनी भरलेल्या व्याजाची रक्कम त्यांच्या खाती कधी जमा होणार हे रामभरोसेच आहे, असे म्हणावे लागेल.