आपल्याकडे पदवीच्या अभ्यासक्रमात राज्यशास्त्र हा विषय शिकवला जातो. मात्र, प्रत्यक्षात राजकारण हा वेगळाच खेळ असतो. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडय़ा करण्याची संधी सतत शोधत असतात. अलीकडे अनेकांनी राजकारण हे करियर म्हणून निवडले आहे. वकिली, वैद्यकीय व्यवसाय सोडून राजकारण करणारे अधिक धनवान झाले आहेत. त्यामुळे ‘पॉलिटिक्स’ हा कायमच सर्वांच्या आकर्षणाचा विषय आहे. राहता राहिला लोकांचे प्रश्न सोडवण्याचा मुद्दा, तर राजकारणाच्या प्राधान्यक्रमात तो सगळय़ात शेवटी येतो. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण रसातळाला गेले आहे. महाविकास आघाडी सरकारातील घटकपक्ष आपापल्या पद्धतीने राज्य करीत आहेत. आमदारांची संख्या जास्त असूनही विरोधात बसावे लागल्याने भाजप अखंड चुळबुळत आहे. या अस्वस्थतेतूनच ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि तत्सम यंत्रणांचा वापर वाढत आहे. महाराष्ट् विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवून त्यांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे विधानसभेत सांगितले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी याकामी सत्ताधारी नेत्यांच्या संधानातून षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवरून सोलापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करायचा कट कसा होता, त्याचप्रमाणे साक्षीदार, पुरावे वगैरे सगळय़ा गोष्टी ‘मॅनेज’ कशा करायच्या, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भ्रष्ट कार्यपद्धती, अशा प्रकारच्या षडयंत्रासाठी ते कसे उपयुक्त होते, गिरीश महाजन यांना एका प्रकरणात अडकवण्यासाठी आधीच रक्त लावलेला चाकू आणायचा आणि खोटय़ा गुन्ह्य़ात त्यांच्यावर कारवाई करायची, अनिल गोटे यांचा संवाद, पडद्याआडून मार्गदर्शन करणारे नेते, वकिलांनीच तयार करून दिलेले ‘एफआयआर’ अशा अनेक मुद्यांचा उहापोह करणारे ‘पेनड्राईव्ह’ श्री. फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले, तेव्हा सगळेच स्तंभित झाले. स्वतः फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, सुधीर मुनंगटीवार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे यांना अडकवण्याचे कारस्थान कसे सुरू आहे, त्यात विशेष सरकारी वकिलांसह, पोलिस आयुक्त, विविध मंत्री, भाजपमधून बाहेर पडलेले असंतुष्ट नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशा सगळय़ांचा समावेश असल्याचे फडणवीस यांचे म्हणणे आहे. हा सगळा उलगडा करणारे 125 तासांचे रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या चित्रपटाचे किंवा वेबसीरिजचे कथानक शोभावे असा हा प्रकार आहे. श्री. फडणवीस यांचा रोख प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांवर होता. नामोल्लेख न करता त्यांनी शरद पवार यांच्याकडेही संशयाची सुई वळत असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या या हल्ल्यामुळे आरंभी दिग्मूढ झालेले काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते नंतर सावरले. काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे सरकार सत्तेत होते, तेव्हाच अशी गुन्हेगारी प्रवृत्ती बळावल्याचा आरोप केला. गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी आपण याप्रकरणी सभागृहात उत्तर देऊ असे सांगताना पोलिसांचा गैरवापर भाजपनेच सुरू केला होता, असे नमूद केले आहे. श्री. राठोड, श्री. देशमुख यांच्यानंतर श्री. नवाब मलिक यांचाही राजीनामा घेण्याबाबत फडणवीस आग्रही आहेत. एकमेकांच्या गंभीर गैरकारभाराची जाहीर वाच्यता न होऊ देता पोकळ धमक्मया देऊन ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा प्रकार सुरू आहे, असे दिसते. एकूणच, हे प्रकरण खरोखर गंभीर आहे की आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून विधिमंडळाचे कामकाज गुंडाळणार हे येत्या काळात कळेलच. शेतकऱयांचे वीजबिल माफ करू असे म्हणणाऱया महाविकास आघाडीने आता वीज बिल वसुली सुरू केली. सोलापूर जिह्यातील एका शेतकऱयाने आत्महत्या केली आहे. या आणि अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा न करता वेळेचा अपव्यय करण्याकडेच सर्वपक्षीयांचा कल आहे. दुसरीकडे, सक्तवसुली संचालनालयाचे म्हणजे ‘ईडी’चे काही अधिकारी वसुलीचे काम करीत आहेत, असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांपुढे केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग केंद्रातील भाजप सरकार करीत आहे, शिवसेनेच्या विशिष्ट नेत्यांना ‘टार्गेट’ करून त्यांच्यावर छापेमारी करण्याचे उद्योग सुरू आहेत. जितेंद्र नवलानी नावाची व्यक्ती ईडीचे रॅकेट चालवत आहे, त्याच्या बँक खात्यात एकाएकी 25 कोटी कुठून ट्रान्स्फर झाले असे सवाल करत महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षण विधेयकामुळे पुढे गेल्या आहेत, तोवर हे प्रकार सुरू राहतील, असे श्री. राऊत यांचे म्हणणे आहे. फडणवीस यांच्याकडे असलेल्या ‘पेनड्राईव्ह’मधील संभाषणात राऊत यांचाही उल्लेख आहे. श्री. फडणवीस यांना या स्टिंग ऑपरेशनचा सुगावा नेमका विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच कसा लागला, विधानसभेत असा गौप्यस्फोट करून पुढील दिवसांमध्ये याच मुद्यावर चर्वितचर्वण करीत बसायचा त्यांचा हेतू आहे काय, असा संशय घ्यायला जागा आहे. विधिमंडळ अधिवेशनात लोकांचे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या एकमेकांना खपवण्याचे आणि वाचवण्याचे उद्योग सुरू आहेत. ‘उडदामाजी काळे गोरे’ या म्हणीचे प्रत्यंतर महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहून येत आहे. महागाईने त्रस्त झालेली जनता, वीजबिल आणि कृषीविषयक अन्य अडचणीत सापडलेला शेतकरी, आरोग्याचे प्रश्न अशा कचाटय़ात सापडलेल्या मराठी माणसाला विधानसभेत घडवल्या जाणाऱया रहस्यकथांमध्ये कितपत रस असेल? सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांबाबत लोकांच्या मनात सहानुभूती शिल्लक राहणार नाही. एकमेकांचे वाभाडे काढण्याच्या राजकारण्यांच्या या उद्योगात लक्ष घालायला कुणालाच वेळ नाही, हे ध्यानात घेतलेले बरे !
Previous Articleमहाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ (15)
Next Article आजचे भविष्य गुरुवार दि.10 मार्च 2022
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.