उत्तर प्रदेशात अलिगढ येथे जन्मलेल्या रसीद जहाँ यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा जणू चंगच बांधला होता. त्या शिक्षणाने डॉक्टर आहेत. तथापि त्यांनी तो व्यवसाय न करता आपल्या समाजातील कुप्रथा दूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुस्लीम समाजात महिलांवर कसे अन्याय होतात, त्यांना कसे पुरुषवर्चस्ववादाचे बळी ठरावे लागते, त्यांच्यावर कशी अनाठायी आणि असहय़ बंधने घातली जातात, तसेच त्यांची अंतःप्रेरणा आणि बुद्धीमत्ता धर्माच्या नावावर कशी खच्ची केली जाते यासंबंधीच्या अनेक कथा त्यांनी लिहून प्रसिद्ध केल्या. या अन्यायाविरोधात आवाज उठविला. केवळ लेखणीद्वारेच नव्हे, तर विविध व्यासपीठांवरुनही त्यांनी हे कार्य केले. त्यांचा जन्म 1905 चा आहे. आज त्या नाहीत. पण त्यांचे कार्य अनेकांच्या स्मरणात आहे. सामाजिक विषयांवर आणि मुस्लीम समाजातील कुप्रथांवर त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासूनच लेख सुरू केले होते. त्यांच्या पहिल्या कथेला नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण केले जात आहे.
त्यांच्या या कार्याला धर्माविरोधात युद्ध असा रंग देण्यात आला. त्यामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यांच्या विरोधात फतवे काढण्यात आले. त्यांच्या काही कहाण्यांवर दबावाखाली बंदी घालण्यात आली. तथापि, त्यांनी न घाबरता आपले कार्य सुरु ठेवले. त्यांनी प्रगतीशील लेखन आंदोलन ही संस्था स्थापन केली. नंतर त्यांनी 1948 मध्ये रेल्वे आंदोलनात भाग घेतला. 16 दिवसांचे उपोषण केल्याने त्यांची प्रकृती बिघडली. उपचारांसाठी त्या मास्कोला गेल्या. पण तेथे उपचारांचा उपयोग न होता त्यांचा देहांत झाला.