यात्रा, लग्नसराई, तापमान वाढीमुळे भाव वधारले : विजापूर जिल्हय़ात लिंबूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात
अरुण टुमरी / काकती
बेळगावच्या घाऊक बाजारात लिंबूंची आवक वाढली असून यात्रा, लग्नसराई, तापमान वाढ यामुळे मोठय़ा प्रमाणात मागणी वाढत आहे. परिणामी लिंबूचे भाव वधारले आहेत. किरकोळ बाजारात लहान लिंबू 10 रुपयांना 3 ते 4 तर मोठे लिंबू 2 मिळत आहेत. तर किरकोळ किराणा दुकानातून लहान लिंबू 4 रुपयाला 1 व मोठा लिंबू 7 रुपयाला 1 ग्राहकांना मिळत आहे.
डिसेंबरच्या हंगामात विजापूर जिल्हय़ात लिंबूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले. त्यावेळी 10 रुपयांना 8 ते 10 लिंबू मिळत होते. मात्र पंधरवडय़ात बाजारातील मागणीप्रमाणे भाव वधारले आहेत. या कालावधीत 10 हजार गोणींची घाऊक विक्री झाली आहे. एका गोणीत प्रतवारी, आकारानुसार 400 ते 550 लिंबू असतात. याप्रमाणे मागणी वाढत असल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. राज्याच्या एकूण उत्पादनापैकी 58 टक्के उत्पादन विजापूर जिल्हय़ात होते. त्यापैकी 50 टक्के इंडी तालुक्यात होते. विजापूर, कलातगी व इंडी तालुक्यातून मोठय़ा प्रमाणात लिंबूची आवक वाढली आहे. तर शेतकऱयांच्या पदरात 2 ते 4 रुपयेपर्यंत भाव मिळत असल्याने लिंबू बागधारक शेतकरी आर्थिक फायद्यात आहेत. लिंबू उत्पादक शेतकऱयाला सोन्याचे दिवस आले आहेत. तर इतर फळे व भाजीपाला पिकविणाऱया शेतकऱयांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने मेटाकुटीला आले आहेत.
विजापूर लिंबू विकास मंडळाच्या अधिकाऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 11,752 हेक्टरमध्ये लिंबूची लागवड करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य लिंबू उत्पादनात देशात चौथ्या क्रमांकावर आहे. तर जगाच्या तुलनेत लिंबू उत्पादनात भारताचा हिस्सा 92 टक्के आहे. संपूर्ण भारतात उत्पादन वाढले असून मागणी वाढल्याने भाव तेजीत आहेत. यापूर्वी बेळगाव घाऊक बाजारात लिंबूच्या एका गोणीचा भाव 400 ते 500 रुपये पर्यंत होता. तर आता 500 ते 1200 रुपये पर्यंत निश्चित भाव मिळत आहे.
गेल्या वर्षी या महिन्यापासून कोरोना संसर्ग लॉकडाऊनच्या काळात 100 ते 200 रुपये एका गोणीला भाव मिळाला होत. तर यंदा चित्र पालटले असून लिंबू उत्पादक शेतकरी एकमेव फायद्यात आहे.