प्रतिनिधी /पणजी
आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राखून ठेवण्यात आलेला अंतिम निवाडा आज गुरुवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातर्फे देण्यात येणार आहे. त्या निवाडय़ाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
काँग्रेसचे 10 आणि मगो पक्षाचे 2 असे एकूण 12 आमदार पक्षातून फुटून नंतर भाजपमध्ये सामील झाले होते. त्यांच्या विरोधात उपरोक्त दोन्ही पक्षातर्फे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे अपात्रता याचिका सादर करण्यात आल्या होत्या. त्यांनी निकाल द्यावा म्हणून दोन्ही पक्षांनी सातत्याने मागणी केली तसेच सभापतींना स्मरणपत्रे पाठवली. तथापि सभापतींनी दोन-तीन वेळा सुनावणी घेतली परंतु निकाल काही दिला नाही.
राखून ठेवला होता निकाल
सभापती निकाल देत नाहीत म्हणून गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व मगो पक्षाचे नेते आमदार सुदीन ढवळीकर या दोघांनी न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणी नवीन याचिका सादर केली व निकाल देण्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर त्यावर अनेकदा सुनावणी झाली आणि निकाल राखून ठेवण्यात आला होता. तो आज खंडपीठाच्या वतीने देण्यात येणार आहे.
आता अलिकडेच गोवा विधानसभेसाठी निवडणूक झाली असून त्यात ते बहुतेक फुटीर आमदार विविध पक्षांतर्फे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्या निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. तत्पूर्वी न्यालयाच्या निकालात फुटीर अपात्र ठरले किंवा नाही ठरले तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. न्या मनीष पितळे व न्या. आर एन. लढढा यांचे खंडपीठ हा निकाल देणार असून त्या सर्व फुटीर आमदारांनी राजीनामे देऊन पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली आहे.