जिल्हाधिकारी सकारात्मक, आमदार नाईक यांची माहिती
प्रतिनिधी / कणकवली:
गतवर्षीप्रमाणेच यंदाही लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ाबाहेरून लोक मोठय़ा प्रमाणात आले आहेत. त्यांचा गावनिहाय सर्व्हे करण्यात यावा. त्यानुसार लसीकरणासाठी जादा लस मागविणे. तसेच इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार आहे, याकडे आपण जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार गावात बाहेरून आलेल्यांचे सर्वेक्षण करून डाटा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्गच्या नियमित लोकसंख्येसोबतच जिल्हय़ात सध्या बाहेरून आलेल्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई व इतर ठिकाणाहून चाकरमानी मोठय़ा प्रमाणात जिल्हय़ात आले आहेत. या चाकरमान्यांची अलिकडच्या काळात नोंद झाली आहे. मात्र, त्या अगोदरही काही चाकरमानी जिल्हय़ात आले आहेत. त्यांची नोंद गावनिहाय झालेली नाही. त्यामुळे आपल्याकडे लसीकरणाची मागणी करताना त्या प्रमाणात करण्याची गरज आहे. तसेच जिल्हय़ातील सध्याची लोकसंख्या ही नियमित लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याने आरोग्यविषयक सोईसुविधा, आपत्कालीन सुविधांच्या बाबतीतही जादा सुविधा उपलब्धतेची गरज आहे. यासाठी गावनिहाय जादा आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण होण्याची गरज आहे. तसा डाटा तयार झाला तर गावात बाहेरून किती लोक आले, ते समजणे शक्य होईल. त्यानुसार प्रशासनाला नियोजन करण्यात येईल, अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱयांकडे केली होती, असे नाईक यांनी सांगितले.
त्यानुसार गावनिहाय सर्वेक्षण करून बाहेरून आलेल्यांची माहिती घेऊन यादी तयार करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत. त्यानुसार तातडीने कार्यवाही होणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.