तपासात निष्पन्न : आधी दिले होते मांडकुलीच्या बाबल्या नाईककडे : विक्री न झाल्याने पुन्हा व्यवहाराचा प्रयत्न
वार्ताहर / सावंतवाडी:
देवगड पेंढरीतील समीर सूर्यकांत गुरव याच्या घरात 25 ते 30 वर्षांपूर्वीचे बिबटय़ाचे कातडे शोपीस म्हणून ठेवण्यात आले होते. त्याच्या पणजोबांच्या काळातील कातडे त्याने पैशांच्या हव्यासाने मांडकुली येथील शत्रुघ्न ऊर्फ बाबल्या नाईक याच्याकडे विक्रीसाठी दिले होते. मात्र, त्याने व्यवहार न केल्याने समीर याने पुन्हा ते कातडे आणून नव्याने विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. बाबल्या नाईक सराईत असून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सध्या वॉन्टेड आहे.
मळगाव घाटीत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कातडय़ाची वाहतूक करताना पाचजणांवर कारवाई केली होती. तपासात सदर कातडे जुने असल्याचे निष्पन्न झाले आहे. आताच्या बाजारभावानुसार या कातडीची किंमत पाच लाखाच्या घरात आहे. समीर गुरव (रा. देवगड) याने आपल्या घरात असलेले बिबटय़ाचे कातडे दिल्याचे निष्पन्न झाले आहे. मांडकुली येथील बाबल्या नाईक याच्याशी त्याचा काही संबंध आहे का, याचा तपास केला जाणार आहे.
मळगाव घाटीत गुरुवारी दुपारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारसह पाचजणांना ताब्यात घेतले होते. त्यांना वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची वनकोठडी देण्यात आली. हा कातडी तस्करीचा व्यवहार वाहन खरेदीतून झाल्याचे तपासात पुढे येत आहे. देवगड पेंढरीतील समीर सूर्यकांत गुरव यांच्या घरात त्याच्या आजोबा-पणजोबांनी काही वर्षांपूर्वी बिबटय़ाचे कातडे शोपीस म्हणून ठेवले होते. मात्र, घरातील हे कातडे समीर याने वाहन खरेदी व्यवहारातून मांडकुली येथील बाबल्या उर्फ शत्रुघ्न नाईक याला काही महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र, त्याने पुढे विक्री व्यवहार केला नाही. त्यामुळे समीर याने हे कातडे पुन्हा आपल्या घरी आणले. त्यानंतर पुन्हा माजगाव-सावंतवाडी येथील व्यंकटेश दत्तात्रय राऊळ व नितीन प्रकाश सूर्यवंशी यांच्यामध्ये जो वाहन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला, त्यातून कातडे त्यांना देण्यात आले.
त्यांच्या वाहनात हे कातडे असल्याची टीप स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने गणपतीच्या सातव्या दिवशी दुपारी समीर व त्याचे मित्र त्याच्या मित्राकडे भोजनासाठी जात होते. त्यावेळी कातडे आढळले. वनविभागाच्या पथकाने दिवसभर कसून तपास केला असता त्यातून अनेक बाबी पुढे आल्या.
बाबल्या नाईक हिटलिस्टवर
पैशाच्या लालसेपायी समीर याने घरातील कातडे विक्रीस दिले. तर विक्री व्यवहार करणारा मांडकुली येथील बाबल्या नाईक हा सराईत गुन्हेगार आहे. तो सध्या पोलिसांच्या हिटलिस्टवर आहे. अनेक प्रकरणात त्याचा हात आहे. कातडय़ाची तस्करी बाबल्या नाईक करणार होता. त्याचा आणखी कुणाशी संबंध आला आहे का, याचाही शोध वनविभाग घेत आहे. सद्यस्थितीत बिबटय़ाची हत्या झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता वनविभाग समीर गुरव व दिनेश गुरव या दोघांच्या देवगड येथील घरी तपासणी करणार आहे. तसेच माजगाव येथील व्यंकटेश राऊळ, किरण सावंत हे नाहक या प्रकरणात अडकले. ते फक्त मित्रांसोबत गाडीत होते. त्यांना याबाबत कोणतीही कल्पना असल्याचे तपासात पुढे येत आहे, असे वन अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
पाच लाखाहून अधिक किंमत
सद्यस्थितीत बिबटय़ाच्या शेपटीपासून ते कातडय़ाची 1.67 सेंटीमीटर एवढी लांबी आहे. त्यामुळे बाजारभावानुसार पाच लाखाहून अधिक किंमत आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. बाबल्या नाईक हा ताब्यात मिळाल्यानंतर त्याच्याकडून अनेक बाबी उघड होणार आहेत. तसेच जिह्यात वन्यप्राण्यांची हत्या करून त्यांची तस्करी होण्यामागे आंतरराष्ट्रीय संबंध आहे का, याचाही उलगडा होणार आहे. वनविभागाने त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सर्जेराव सोनवडेकर, वनक्षेत्रपाल मदन, सागर व प्रमोद सावंत हे तपास करत आहेत. वनकोठडीत असलेल्या पाचही संशयितांचा वाहन खरेदी-विक्रीचा धंदा आहे. त्यातून त्यांची एकमेकांशी ओळख झाली आहे. वाहन खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहार, देवाण-घेवाण यातूनच कातडय़ाची वाहतूक आणि विक्री व्यवहार करण्याचा त्यांचा इरादा होता.