ऑनलाईन टीम / इटानगर :
अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या 5 तरुणांना चिनी लष्कराने भारताच्या हाती सोपवले आहे. लष्करी सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तनू बाकार, प्रसाद रिंगलिंग, न्गारू दिरी, डोंगटू ईबिया, तोच सिंगकाम अशी भारताच्या ताब्यात दिलेल्या तरुणांची नावे आहेत. हे पाचही तरुण तागिन समुदायाशी संबंधित आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे लोक जंगलात शिकार करण्यासाठी गेले असताना त्यांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले होते.
दरम्यान, बेपत्ता तरुणांबाबत भारताने चीनकडे विचारणा केली होती. त्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराच्या संदेशाला हॉटलाइनवर प्रतिसाद देऊन हे पाच तरुण आमच्या भागात आल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. बेपत्ता झालेल्या लोकांना भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेवर काम सुरू होते. अखेर चीनने या तरुणांना आज भारताच्या हवाली केले.