जमिनी संपादनाबाबत नोटिफिकेशन : शेतकरी-व्यावसायिकांना पुन्हा फटका : होनगा ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या जमीनमालकांना नोटिसा
प्रतिनिधी / बेळगाव
बेंगळूरपासून महाराष्ट्रापर्यंत जोडणाऱया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (एनएच-4) रस्त्याचे आता पुन्हा रुंदीकरण होणार असून हा रस्ता सहा पदरी होणार आहे. त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे एका इंग्रजी आणि कन्नड दैनिकामध्ये नोटिफिकेशन देण्यात आले आहे. आता काही शेतकऱयांना नोटिसाही दिल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली असून राष्ट्रीय महामार्गाशेजारी लागून असलेल्या अनेक व्यावसायिक आणि आस्थापनांना तसेच शेतकऱयांना फटका बसणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 चे 20 वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले होते. त्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, अलीकडे वाहनांची संख्या वाढत गेल्यामुळे रस्त्याचे पुन्हा रुंदीकरण वाढविण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला. आता हा रस्ता सहा पदरी होणार आहे. त्यामुळे होनग्यापासून महाराष्ट्राला जोडलेल्या कोगनोळीपर्यंतच्या सर्व्हे क्रमांकाचे नोटिफिकेशन काढण्यात आले. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली असून रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱयांना मोठा फटका बसणार आहे.
नोटिफिकेशन काढल्यानंतर तातडीने हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, बेळगाव ते कोल्हापूरपर्यंत मराठी भाषिकांच्याच जमिनी असल्यामुळे त्यांना या नोटिफिकेशनबाबत कोणतीच माहिती नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे आता शेतकऱयांना नोटिसा पाठवून थ्रीडी झाल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी चौपदरीकरणामध्ये शेतकऱयांची हजारो एकर जमीन गेली. आता पुन्हा हजारो एकर जमीन जाणार आहे. रस्त्याला लागून अनेकांनी धाबा, हॉटेल्स, पेट्रोल पंप, इतर व्यवसाय थाटले आहेत. त्यांनाही याचा मोठा फटका बसणार आहे.
याबाबत शेतकरी तसेच विविध आस्थापनांचे मालक न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अत्यंत गुप्तपणे या जमिनी घेण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील 515.000 कि.मी. ते 592.705 कि.मी. पर्यंतच्या रस्त्यासाठी हे नोटिफिकेशन काढले आहे. होनगा ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या एकूण 77.704 कि.मी. पर्यंतच्या सर्व्हे क्रमांकामधील ही जमीन घेतली जाणार आहे, असे या नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हरकती नोंदविण्याबाबत शिवबसवनगर, बेळगाव येथील कार्यालयाचा पत्ता दिला होता. मात्र, नोटिफिकेशन आल्याची माहितीच शेतकऱयांना नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली. बेळगाव तालुक्मयामध्ये येणाऱया बंबरगे, बरमनट्टी, भुतरामहट्टी, हलभावी, होनगा, सुतगट्टी या गावांतील जमिनी या रस्त्यामध्ये जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांमध्ये खळबळ उडाली आहे. काही शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्या जमिनी जाणार असल्याने ते भूमिहीन होणार आहेत.