अत्यावश्यक सेवा बजावणाऱयांना फटका
वार्ताहर/ परळी
जिह्यात गेल्या महिन्याभरापासून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शहरातील सीमा बंद करण्यात आले आहेत. शहरात येण्यासाठी फक्त कोरेगाव मार्ग व मोळाचा ओढा तसेच वाढे फाटा मार्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. इतर सर्व मार्ग कडेकोट बंदोबस्तात बंद केले आहेत. सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेला बोगदा ही बंद केल्याने अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक व कर्मचाऱयांना शहरात जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावे लागत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सातारा शहराच्या पश्चिम भागाला जोडणारा बोगदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोणाला जर शहरात यायचे असेल तर शेंद्रे मार्गे हायवेकडून यावे लागत आहे. विनाकारण आठ ते दहा किलोमीटरचे अंतर प्रवास हा करावा लागत आहे. आत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक तसेच कर्मचाऱयांना देखील वाहतूक बंद असल्याने दूध वितरण, डॉक्टर तसेच किराणा व्यावसायिक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. किराणा माल घ्यायचा असेल गाडी येथे लावा आणि चालत जाऊन खरेदी करा असा सल्ला ही दिला जात आहे. राजवाडा ते बोगदा हे अंतर जवळ पास 2 किलोमीटर आहे. त्यातच बाजार डोक्यावर घेऊन प्रवास करणे कठीण होत असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी तरी सुरु करावा अशी मागणी करत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून बोगदा मार्ग बंद असल्याने परळी भागातील भाजीपाला ही खरेदी विक्रीवर परिणाम झालेला दिसत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तरी सर्व तपासणी करून का होईना पण आत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक वा कर्मचाऱयांना वाहतूक सुरू करावी अशी मागणी होत आहे.