केंद्रीय समितीच्या खास बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /फोंडा
भंडारी समाजाचे गोव्यात प्राबल्य असूनही राजकीय क्षेत्रात त्यांना प्रतिनिधीत्व देताना नेहमीच अन्याय केला जातो. आगामी निवडणुकीत भंडारी समाजाला जास्तीत जास्त जागांवर उमेदवारी देणाऱया पक्षाला पाठिंबा देण्याचा ठराव केंद्रीय समितीच्या खास बैठकीत घेण्यात आला. बैठकीला मुख्य समितीबरोबरच सर्व बारावी तालुका समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचीही बैठकीला उपस्थिती होती.
वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी प्रवेशासंबंधी आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केल्याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. इतर मागासवर्गींत येणाऱया 18 घटकांनी आरक्षणासंबंधी निवेदन सादर करावे, अशी सूचनाही करण्यात आली. भंडारी समाजातर्फे लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. इतर राज्यात या आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र गोव्यात तो मिळू नये हा अन्याय आहे. सर्व घटकांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे. बहुसंख्येने असलेला भंडारी समाज त्यांना सर्वतोपरी मदत देण्यास नेहमीच पुढे असेल, असे मत अशोक नाईक यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीसंबंधी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना भंडारी समाजाचे महत्त्व ओळखून त्यांनी बारा जागा दिल्या होत्या. त्यापैकी बहुतेक उमेदवार निवडून आले होते. निवडणुकीची तयारी करणाऱया राष्ट्रीय पक्षांनी भंडारी समाजाचा प्रामुख्याने विचार करावा. ज्या मतदारसंघात या समाजाचे वर्चस्व आहे तेथील जागा भंडारी समाजातील उमेदवाराना द्याव्यात. बहुसंख्य समाजबांधव या उमेदवाराच्या पाठिशी राहतील असा ठराव बैठकीत घेण्यात आला. दरम्यान अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय समितीचे काम पाहून आमसभेने मुदतवाढ दिल्याबद्दल स्वागत करण्यात आले. बैठकीत प्रवेश आरक्षण, सरकारी नोकऱयांचा अनुशेष आदी मुद्यांचा पाठपुरावा करताना समाज बांधवांच्या हक्कासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. अजूनही समाजाचे काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी या समितीची गरज होती. आमसभेने ती पूर्ण केली, याबद्दल अभिनंदन करण्यात आले. मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्याहस्ते अशोक नाईक यांचा सत्कार करण्यात आला.