ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आज संपूर्ण जग कोरोनाविरोधात एकवटले आहे. सर्व यंत्रणा कोरोनाविरोधात युध्द पातळीवर लढा देत आहेत. भारतातील प्रत्येक नागरिक या लढाईचा शिपाई आहे. भविष्यात कोरोनाविरोधातील लढाईचा वेध घेतला जाईल तेव्हा भारतातील नागरिकांच्या लढाईचा गौरव होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे आज जनतेशी संवाद साधला.
मोदी म्हणाले, कोरोनासारख्या भीषण संकटाचा आपण सर्वजण सामना करत आहोत. देशातील सर्व घटकांचे योगदान या लढाईत महत्वाचे आहे. संकटकाळात कोणी घरभाडे माफ करत आहे, कोणी किराणा देत आहे, शेतकरी अन्न पुरवत आहे. कोणी पेन्शन तर कोणी गरीबांना अन्न पुरवत आहे. कोणी हजारो गरिबांना मोफत जेवण देत आहे. या संकटात सर्वजण आपापल्या परीने लढत आहेत. त्यामुळे भविष्यात भारतातील नागरिकांच्या लढाईचा गौरव होईल. संकटाच्या काळात भारताने जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.
covidwarriors.gov.in या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सव्वा कोटी जण जोडले गेले आहेत. डॉक्टर्स, परिचारिका, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक याच्याशी जोडले आहेत. तुम्ही देखील याच्याशी जोडले जाऊन कोविड वॉरियर बना, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.