पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी ई-कमळ ऍप सादर केले आहे. याचबरोबर भाजपचे प्रचारगीत ‘आत्मनिर्भर बिहार’ही प्रसिद्ध करण्यात आले आहे. भाजप आहे, तर विश्वास आहे असे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी काढले आहेत. राजद आणि त्याचे सहकारी पक्ष जुन्या काळातील दरोडेखार पुन्हा आणू पाहत आहेत. रक्तरंजित बिहार पुन्हा निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. परंतु तसा बिहार आम्ही येऊ देणार नाही असा दावा जायसवाल यांनी केला आहे.
महाआघाडी अपवित्र आघाडी आहे. जीतनराम मांझी यांचा विश्वासघात करण्यात आला. उपेंद्र कुशवाह यांची फसवणूक झाली, कुशवाह सध्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. मुकेश सहनी यांनाही फसविण्यात आले. झारखंड मुक्ती मोर्चाला दूर सारण्यात आले. तेजस्वी यादव यांचे नेतृत्व कमकुवत आहे. तर डावे पक्ष राजदच्या मदतीने सत्तेवर येऊ पाहत आहेत असे भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे.
भाजप आणि संजदच्या शासनकाळात बिहारमध्ये 15 वर्षांपासून शांतता नांदतआहे. काँग्रेस आणि महाआघाडी समुदायांमध्ये संघर्ष घडवून आणू पाहत आहे. आमची आघाडी तीन चतुर्थांश जागावर विजयी होऊन नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे.
भाजपची आघाडी आता केवळ संयुक्त जनता दलासोबत आहे. चिराग पासवान यांनी कुठलाही भ्रम बाळगू नये. चिराग काय म्हणतात, त्याने फरक पडत नाही. भाजपचा चिराग यांच्या लोकजनशक्ती पक्षाशी कुठलाच संबंध नसल्याचा दावा यादव यांनी केला आहे.