प्रतिनिधी / पेठ वडगाव
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्षाच्या व्यवस्थेवर विश्वास आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांची जिल्ह्यात कामगिरी चांगली आहे. त्यांच्या पाठीशी भाजपा कार्यकर्ते ठामपणे उभे असल्याचे भाजपा ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोक चौगुले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेहमीच भाजपात महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
पेठ वडगाव येथे दोन दिवसांपूर्वी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा , माजी हातकणंगले तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील यांनी पदवीधर निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जिल्हाध्यक्ष घाटगे यांच्या राजीनाम्याची मागणी पत्रकारपरिषदेत करून खळबळ माजविली होती.यावेळी भाजपात जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.
भाजपच्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकारपरिषदेत हे आरोप फेटाळून लावले. नाराजी व्यक्त करताना ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडण्याची गरज होती. झालेले आरोप तथ्यहीन असून पराभवाची समीक्षा पक्ष करीत असून लवकरच निष्कर्ष समोर येतील त्यानुसार बदल केले जातील. मात्र चंद्रकांत पाटील व समरजीत घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची जिल्ह्यात कामगिरी चांगली असून सर्वजण त्यांच्या पाठीशी असल्याची भूमिका सर्वांनी मांडली. राज्य नेतृत्वाविरोधात बंड पुकारणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? या प्रश्नावर चौगुले यांनी पक्ष योग्य निर्णय घेईल असे स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष सयाजी पाटील, तालुका सरचिटणीस सुरेश पाटील,भूपाल कांबळे,धनंजय गोंदकर आदींसह हातकणंगले तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.