मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे युवावर्गाला आवाहन, युवा संसदेत मार्गदर्शन
प्रतिनिधी / पणजी
भारत देशाल विश्व गुरु बनवण्यासाठी युवा संसदेच्या माध्यमातून पंतप्रधानांना सहकार्य करावे व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयमवरील युवा संसदेत ते युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, अध्यात्मीक गुरू डॉ. गौर गोपाल दास, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष, मिटसॉगचे संस्थापक व संसदेचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, आमदार दयानंद सोपटे आणि सुलक्षणा सावंत हे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेस काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांनी साथ दिली आहे. आता युवा संसदेतील आवाज दिल्लीपर्यंत पेहोचवा, भारताला विश्व गुरु बनवण्यासाठी युवकांची मोलाची साथ मोदींना हवी आहे, ती साथ सर्वानी द्यावी, असेही डॉ. सावंत यांनी नमूद केले. युवकांसाठी सर्वाधिक योजना राबवणारे गोवा हे देशातील प्रथम राज्य आहे. शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असून विविध शिक्षण संस्था, विद्यापीठे यांच्यासोबत करार करण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
देश प्रगतीसाठी वाचन महत्त्वाचे ः गोविंद गावडे
कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी, युवक हे देशाचे आधारस्तंभ आहेत. प्रत्येक युवकाने जबाबदारी घेतली तर देश आणखी प्रगती करेल. त्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. युवकांनी चांगल्या कार्यासाठी झोकून द्यावे. निराशेला बाजूला सारून युवकांनी राष्ट्रहिताच्या दिशेने कार्य करावे, असे आवाहन केले.
देशाला सर्वोत्तम कणखर पंतप्रधान मिळाल्याने या देशातून बाहेर गेलेल्या सांस्कृतिक धरोहर आज आम्हाला परत मिळाल्या आहेत. येथील सभ्यता, संस्कृती आणि परांपरिक धरोहरने संपूर्ण जगाला मार्गदर्शन केले आहे. आमच्या पूर्वजांचे नियोजन हे जगातील सर्वोत्तम होते. आज त्याच जोरावर आम्ही राष्ट्रांचा विकास करत आहे. या देशाला सतत खंडित करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतू पंतप्रधानांच्या नेतृत्वात देशातून बाहेर गेलेल्या प्राचीन वस्तू परत मिळत आहेत हे अभिमानास्पद आहे, असे विचार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी व्यक्त केले.
अŸड. मिनाक्षी लेखी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवकल्याणासाठी ज्या योजना अंमलात आणल्या त्यामध्ये सर्व युवकांचा सहभाग सर्वाधिक असावा. युवकांनी लक्ष निर्धारित करून आत्मविश्वासाने समोरे जावे. युवकांनी आपल्या शक्तीचा उपयोग देशनिर्मितीसाठी करावे. आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्याचा चेहरा बदलण्यासाठी सर्व लोकांशी संवाद साधला. त्यामुळे विकासाची गंगा येथे वाहत आहे. देशाला सर्वोत्तम कणखर पंतप्रधान मिळाल्याने आम्हाला वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर निघायचे आहे. त्यासाठी युवकांचा सहभाग अधिक हवा.
सुरेश प्रभू म्हणाले, देशाच्या विकासाच्या संकल्पनेत व्यक्तीचा विकास केंद्र बिंदू मानून सर्वांनी कार्य करावे. त्यासाठी या विकासाच्या रथाचे सारस्थ युवकांनीच करावे. सध्या केंद्र आणि राज्यातील ग्रहमान उत्तम असल्यामुळे युवकांनी भविष्य घडविण्यासाठी कार्य करावे. या देशात लोकशाही शिवाय कोणताही पर्याय नाही. त्यामुळेच भविष्यात भारत हा सर्वात विकसीत देश म्हणून उदयास येईल. जो पर्यंत राज्याचा विकास होणार नाही पर्यंत देशाचा विकास होणार नाही. त्यामुळेच विकासाच्या संकल्पनेत जिह्याच्या विकासाला प्राथमिकता देऊन कार्य करावे. गोव्याचा विकास झाला तर या देशातील जीडीपीत वाढ होईल.
राहुल वि. कराड म्हणाले, सुशिक्षीत युवकांनी राजकारणात यावे यासाठी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची स्थापना केली. गोव्यात ही युथ पार्लमेंटला यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा होता. बदलत्या काळानुसार युवकांनी वसाहतवादी मानसिकता बदलण्याची चळवळ उभी करावी. भविष्यात जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या संमेलनाचे आयोजन करण्याचे कार्य सुरू आहे. त्यात देशातील सर्व आमदार आणि खासदार यांचा सहभाग असेल.
डॉ. गौर गोपाल दास म्हणाले, युवकांना जेव्हा जबाबदारीचे भान येईल तेव्हाच नव भारत निर्माण होईल. विविधतेने नटलेल्या या देशाला युवकांनी सामाजिक, राष्ट्रीय आणि वैश्विक योगदान देण्यासाठी स्वतःत बदल करावा. संस्कृती, चरित्र, सामाजिक आणि अध्यात्माला जीवनात उतरविले तर देश उंच भरारी घेईल. नाते, अध्यात्म आणि दुसऱयांच्या चेहऱयावर जेव्हा हास्य पाहता येईल तेव्हाच खऱया अर्थाने तो मानव बनतो. जीवनात आनंद हा आर्थिक उन्नती पेक्षा छोटय़ा छोटय़ा गोष्टीमुळे येतो. नात्यांमध्ये त्यागाला खूप महत्व आहे. जेव्हा त्यागाची भावना येईल त्या सोबत सुख, आनंद सारख्या गोष्टी आपोआपच येईल. तंत्रज्ञानाच्या युगात कितीही प्रगती केली तरी मानवाने सुखाची चावी मागे विसरली आहे का हे पहावे. त्यासाठी कुटुंब, कुटुंबातील त्याग या गोष्टी सर्वात महत्वाचे आहे.
युवा संसदेत डॉ. सय्यद रिजवी, राहुल कराड, तेजस्वी सूर्या, डॉ. सोनल मानसिंग यांची भाषणे झाली. गोवा विधानसभा, गोवा सरकार व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयममध्ये गेले दोन दिवस चालू असलेल्या युवा संसदेचा समारोप झाला. विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱया अनेक युवक युवतींचा डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. आर. चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.