ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीन हिंसेदरम्यान मंगळवारी चीनने ताब्यात घेतलेल्या 10 भारतीय जवानांची सुटका करण्यात आल्याचे वृत्त खोटे आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी भारताच्या कोणत्याही जवानाला चीनने ताब्यात घेतले नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे.
सोमवारी रात्री आणि मंगळवारी भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर चीनने भारताच्या 2 मेजरसह 10 जणांना ताब्यात घेतले होते. या जवानांची सुटका करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून भारत आणि चिनी लष्कराच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांची सतत चर्चा सुरु होती. त्यानंतर या जवानांची सुटका करण्यात आली, असे वृत्त भारतीय मीडियाने प्रसिद्ध केले आहे. लिजिआन यांनी भारतीय मीडियाचे हे वृत्त खोटं असल्याचे सांगत कोणत्याही भारतीय जवानाला चीनने ताब्यात घेतले नसल्याचे म्हटले आहे.