कोरोनासारख्या जागतिक आजाराची मगरमिठी सर्वांभोवती करकचून घट्ट आवळत असताना दुसऱया बाजूला भयभीत लोकांच्या दुबळय़ा मानसिकतेचा फायदा उठवून आपले उखळ पांढरे करून घेण्याची साठेबाज, नफेखोर व काळेधंदेवाल्यांची काळी मनोवृत्ती दुर्दैवाने समोर येत आहे. त्याच्या जोडीला कारणे, उपाय, उपचार सुचवणाऱया वॉटस् ऍप डॉक्टरांचा अनियंत्रित धुमाकूळ सुरू असल्याने दिशाभूल करणाऱया उपायांमुळे अडचणींमध्ये भर पडत आहे. कोरोनाच्या या सामाजिक दुष्परिणामांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाच्या एका मोठय़ा यंत्रणेची ऊर्जा वाया जात आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटापेक्षा हे अरिष्ट सर्वाधिक नुकसानकारक आणि घातक ठरत आहे. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत नागरिकांना योग्य व प्रभावी प्रबोधन व मार्गदर्शनाची गरज आहे. मन विषण्ण करणारी सामाजिक परिस्थिती सध्या सभोवताली आहे. धापा टाकणारी अर्थव्यवस्था, कोसळलेले उद्योग, त्यातून उद्योगधंद्यांना झालेला बेरोजगारी व नोकरकपातीचा संसर्ग, तुटपुंजे वेतन, सरतेशेवटी या सर्वांची घराघराला पोहोचलेली आर्थिक झळ. संपूर्ण समाजमनच अशा कुचंबलेल्या अवस्थेत जगत आहे. मग जिथे रोजच्या जगण्याचीच भीती, तिथे कोरोनासारख्या भयप्रद साथीच्या आजारामुळे मरणाच्या भीतीची आणखीन भर पडली. सरपटत येणारा कोरोनाचा आजार आपला फणा काढून दंश करील की काय, अशी धास्ती सर्वांना छळत आहे. लोकांच्या मनातील याच भीतीचा आता सर्वत्र काळाबाजार सुरू आहे. सोशल मीडियावरून चुकीच्या व गैरसमजुती निर्माण करणाऱया माहितीचा एकसारखा मारा केला जात आहे. एक विशिष्ट वर्ग निव्वळ आर्थिक फायद्यासाठी या संधीचा फायदा उठवत आहे. वास्तविक साथीच्या रोगात अतिशय जबाबदारीने माहिती पुढे पाठवली पाहिजे. ही माहिती वाचून भीतीने गाळण उडालेले भयभीत नागरिक औषधांच्या दुकानाकडे धाव घेताना दिसत आहेत. सॅनिटायझर आणि मास्कचा कृत्रिम तुटवडा व त्याची चढय़ा भावाने विक्री. यावर कडी म्हणजे त्यात सुरू असलेली बनावटगिरी. गोंधळलेल्या परिस्थितीत भारतीय मनोवृत्ती नेहमीच मेंढरासारखी होते. त्याचा गैरफायदा नफेखोर आणि काळेधंदेवाले उपटतात. कोरोना प्रतिबंध लसीच्या नावाखाली बालकांना बनावट द्रव पाजणाऱया महिलांना नुकतीच अटक करून पोलीस कोठडी दिली आहे. ही लस घेतल्याने सर्दी, खोकला होत नाही, असा दावा या महिला करत होत्या. काळय़ाबाजारामध्ये 1 रु.चा मास्क 25 रु.ना तर एन 95 मास्क जो 150 रु.ना मिळतो तो 600 रु.ना विकला जात आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर हँड सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. कारण जागृती करताना प्रशासनातर्फे हात स्वच्छ धुण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. याचा फायदा बनावटखोरांनी घेतला नाही तर नवलच. मुंबईत दोन ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने छापे टाकले. बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा जप्त केला. हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझरमध्ये काही विशिष्ट रसायने आवश्यक असतात, ती यामध्ये आढळली नाहीत. बनावट मास्कदेखील बाजारात आले आहेत. वास्तविक सर्वांनी मास्क वापरण्याची गरज नाही. अशा सूचना वारंवार केल्या जात आहेत. मास्क कुठेही फेकला तर संसर्ग पसरतो. मास्क डिस्पोझरची वेगळीच समस्या निर्माण होत आहे. केवळ भीतीपोटीच मास्कचा अट्टहास केला जात आहे. कोणत्याही धोक्याच्या जाणिवेने आपल्याला अनुभवास येणारी भावना म्हणजे भीती होय. कधी कधी धोका कमी असताना अथवा नसतानाही अनामिक भीतीची लाट मनात उत्पन्न होते. जशी सध्या कोरोनाची भीती आहे. हे स्वाभाविकही आहे. पण कित्येकवेळा समाजातील दुष्ट शक्ती याच दुर्बलतेचा गैरफायदा घेतात. याच काळात वेगवेगळय़ा अफवा पेरल्या जातात. अफवा पसरवणाऱयांना ‘चालते बोलते इन्फेक्शन पसरवणारे घटक ’ म्हणावे लागेल. कारण कमकुवत समाजमनात अफवांचे बी पटकन रूजते. ते फैलावते. अर्धवट ज्ञान नेहमीच धोक्याचे असते. बऱयाचदा अफवा या अर्धवट ज्ञानावर आधारित असतात. हे अर्धवट ज्ञान पुढे सरकवले जाते. एखाद्या चुकीच्या माहितीची पोस्ट केवळ एका बोटाच्या सहाय्याने पुढे पुढे ढकलली जाते. अफवा, भीतीचे अनिष्ट परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर, कृतीवर, दैनंदिन कामकाजावर व समाजावर स्पष्टपणे दिसू लागतात. कोरोनाच्या साथीच्या आजारात ‘चिकन खाणे टाळा’ अशी एक पोस्ट व्हायरल झाली. वास्तविक कोरोनाच्या बाबतीत चिकनचा काही संबंध नाही, असे अधिकृतपणे जाहीर केले असताना केवळ व्यावसायिक स्पर्धा आणि विशिष्ट हेतूने ती पोस्ट व्हायरल केली गेली. या अफवांचे दोन केंद्रबिंदू पोलिसांनी शोधून काढले. त्यांचे हेतूही स्पष्ट झाले. अशाच पद्धतीने कोरोनाच्या अफवांची घुसखोरी व्यवसायात झाली आहे. भीती आणि अज्ञानाचा फटका या व्यवसायांना बसत आहे. अफवा आणि थापा ठोकण्यासाठी सोशल मीडिया हे अलीकडे हक्काचे व्यासपीठ झाले आहे. या माध्यमाची चांगली बाजू नाकारता येत नाही. पण साथीच्या रोगात खरं काय, खोटं काय यामध्ये लोकांचा प्रचंड गोंधळ उडत आहे, हे मात्र निश्चित. कोरोना संसर्ग टाळण्याच्या उपायांचा सोशल मीडियावर अक्षरशः पाऊस पडला आहे. अगदी बाजारू ते नैसर्गिक उपायांपर्यंत. गोमूत्र प्या, आले-लसूण खा, कोमट लिंबू पाणी प्या, तपकीर ओढा,अल्कोहोल घ्या. असे नानाविध उपाय उपचारकर्ते सुचवत आहेत. कोरोनावरील औषध व उपचारावर अजूनही संशोधन सुरू आहे. वास्तविक अनेक गुणधर्म असलेले औषधी लसूण आरोग्यासाठी उत्तमच. पण कोरोनाला रोखण्यासाठी चीनमधील एका महिलेने भीतीपोटी दीड किलो लसूण खाल्ला. अखेर आरोग्याच्या तक्रारीनंतर तिला वेगळय़ा उपाचाराला सामोरे जावे लागले. कोरोना हे संकट आहेच. पण वेगाने पसरणाऱया अफवा या कोरोना विषाणूपेक्षा भयंकर आहेत. म्हणूनच अनुभवी आणि तज्ञ वैद्यकीय सल्ल्याशिवाय उपचाराचे वेडे धाडस करू नये.
Trending
- दिल्लीच्या विजयाने राजस्थान प्ले ऑफमध्ये
- राजस्थान ‘प्ले-ऑफ’चे स्थान निश्चित करण्यास सज्ज
- भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मागविले अर्ज
- पाकिस्तान सर्व सरकारी कंपन्या विकणार
- नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत हंपी, वैशाली, प्रज्ञानंद,भारताचे आव्हानवीर
- पंतप्रधान मोदींची वाराणसीत उमेदवारीची हॅट्ट्रिक
- घाऊक महागाई दर 13 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
- एलटीटीईवर आणखी 5 वर्षांसाठी बंदी