सुटका करून घेत शेतकरी नदीबाहेर, मडुरा येथील घटना
प्रतिनिधी / बांदा:
मडुरा-रेडकरवाडी येथील नदीपात्रात मगरीने शेतकरी राजन यशवंत पंडित (45) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मगरीने डावा हात जबडय़ात पकडला असताना प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. यापूर्वीही मगरीच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वनविभाग याबाबत दखल घेत नसल्याचे आक्रमक शेतकऱयांनी सांगितले.
मडुरा गावात नदीच्या पाण्याचा उपयोग करून रब्बी पिकांचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. शेकडो एकर जमीन लागवडीखाली आली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राजन पंडित आपल्या शेतात गेले होते. इंजिनचा पाईप नदीपात्रात ठेवत असतान मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांचा डावा हात मगरीच्या जबडय़ात अडकल्यानंतरही धीर न सोडता प्रसंगावधान राखत सुटका करून घेत ते नदीबाहेर पळाले. या झटापटीत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
या घटनेची खबर ग्रामस्थांना मिळताच त्यांनी मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांच्या मदतीने जखमी पंडित यांना उपचारासाठी बांदा
प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविले. तर सावंतवाडीहून त्यांना गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. त्यांच्या हाताला झालेल्या जखमेला 11 टाके पडल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
जनावरांवर हल्ले
मडुरा परिसरात मगरींनी गुरांवर हल्ले करण्याचे बरेच प्रकार आतापर्यंत घडले आहेत. मात्र, आता मनुष्यावर हल्ला केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. मगरींचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी उपसरपंच विजय वालावलकर यांनी केली आहे. दरम्यान, वनाधिकाऱयांनी जखमी पंडित यांची विचारपूस केली. तसेच घटनास्थळी भेट दिली.