नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी मागणी; नगरविकास मंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / सांगली
गेल्या दोन वर्षात महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा निधी इतर विकासकामांसाठी वर्ग केला जात आहे. समितीतील सदस्यांना न विचारता परस्पर कारभार केला जातो. ही बाब समितीतील महिला सदस्यांवर अन्याय करणारी आहे. समितीत महिला सदस्याच नामधारी असतील तर ही समितीच बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात, समाजीतील गरजू, गरीब व अन्यायग्रस्त महिलांना सोयी सुविधा देणे, महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहाता यावे आणि त्याकरीता महिलानीच पुढाकार घ्यावा या उद्देशाने शासनाने कायदयाने या समितीची निर्मिती केली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, वार्षिक अंदाजपकानुसार आर्थिक निधीची तरतुद सुध्दा केली. परंतू गेल्या दोन वर्षात महीला बाल कल्याण समितीचा निधी महिलांच्यासाठी न वापरता तो इतर कारणाकरीता वर्ग केला जातो. त्याकरीता समितीची दिशाभूल केली जाते.
तसेच सदस्यांना अंधारात ठेवून, प्रशासन परस्पर निर्णय घेते जातात हि बाब महिला व बाल कल्याण समितीवरच अन्याय करणारी आहे. जर समितीवरच अन्याय होत असेल तर ती महापालिकाक्षेत्रातील महिलांना सक्षम कशी करणार? जर समितीस तिचे अधिकार व निधी वापरता येणार नसेल तर अशी नामधारी समिती काय कामाची? आणि अशा समितीचे सदस्य पदाधिकारी हे नामधारीच ठेवायचे असतील तर ती समिती बरखास्त करावी असे म्हटले आहे..