मल्याळी बांधवासांठी केरळ सरकारचा उपक्रम
प्रतिनिधी / मिरज
केरळमधील मल्याळी बांधवाना मल्याळम भाषेची माहिती करुन देण्यासाठी केरळ राज्य सरकारने राबविलेल्या मल्याळम मिशन या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच सांगलीमध्ये प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केरळ समाजमचे अध्यक्ष टी.जी. सुरेशकुमार होते. मल्याळी बांधवाना मल्याळम भाषा बोलता, लिहता आणि वाचता येण्यासाठी केरळ सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. येत्या काही दिवसात हा उपक्रम सर्व भाषिकांसाठी खुला केला जाणार आहे.
जगातील कानाकोप-यात केरळमधील मल्याळी बांधव उद्योग, व्यवसाय नोकरीसाठी गेले आहेत. अगदी टायर पंक्चर काढण्यापासुन ते बेकरीसह हॉटेल व्यवसायातही ही मंडळी सक्रिय आहेत. नोकरीनिमीत्तही याच मंडळीनी जगाचा कानाकोपराही सोडलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासुन केरळपासुन दुर झालेल्या या समाजातील अनेकांची परप्रांतीय महिलांशी तर अनेक मल्याळम महिलांची अन्य प्ररप्रांतियांशी विवाह झाले असल्याने त्यांच्या मुलाबाळांना मल्याळम भाषा केवळ बोलता येते पण लिहता वाचता येत नाही.त्यामुळे मुळ केरळचे रहिवासी असलेल्या मल्याळी बांधवाना मल्याळम भाषा येणे केरळ सरकारला गरजेचे वाटते आहे.
अनेक मल्याळम जोडप्यांनाही मल्याळम भाषा बोलता येते पण लिहता वाचता येत नाही. मल्याळम भाषा ही अतिषय मृदु आणि नम्र भाषा समजली जाते. त्यामुळे अन्य भाषिकांमध्येही मल्याळम भाषेचा प्रचार होण्याच्या उद्देशानेही केरळ सरकारने या उपक्रमाच्या दुस-या टप्प्यात अन्य भाषिकांनाही यासाठी मल्याळम भाषा शिकण्याची संधी दिली जाणार आहे. या भाषा शिकणा-या स्नातकांना केरळ सरकार विशेष प्रमाणपत्र देणार आहे.