- पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवर साधला संवाद
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे देखील मोदी यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली आणि विविध उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करत आहोत त्या विषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत आहेत. याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. सध्या राज्याला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांना केली. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार देखील मानले.
- स्वतंत्र ॲप विकसित करण्याची मागितली परवानगी
कोविन ॲपमधील तांत्रिक बाबी आणि लसीकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. राज्याला 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी नवे ॲप बनवण्याची राज्याला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचे आहे, त्यासाठी लसीचा पुरवठा करावा, असेही त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.