गोवा-महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिळारी धरणाच्या जलाशयाच्या हेवाळे-बाबरवाडीच्या जंगलात सध्या चार हत्तींचे वास्तव्य असून त्यातल्या नर सुळेवाला हत्ती एका पायाने जखमी असल्याकारणाने लंगडत चालत आहे. त्याच्या सोबत मादी आणि दोन बछडे संचार करत आहेत. सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी बसलेल्या दोडामार्ग तालुक्यातल्या केर-मोर्ले येथे सुस्थितीत असलेला नर तिळारीच्या जलाशयाच्या परिसरात येताना जखमी झालेला आहे. तिळारी-माणगाव खोऱयात हत्ती आणि मानव यांच्यातला संघर्ष टोकाला गेल्याने त्यात डझनभरपेक्षा ज्यादा हत्ती आणि लोकांना मृत्यू आल्याने गजमुखी देवतेला पूजणाऱया लोकमानसाचा हत्तीकडे एकंदर पाहण्याच्या दृष्टिकोनात विलक्षण बदल झालेला आहे. 2001 साली जेव्हा हत्तीचे आगमन कर्नाटकातल्या गोवा-महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवर असलेल्या कणकुंबी वनक्षेत्रात झाले होते तेव्हा त्यांच्या पावलांची पूजा इथल्या स्थानिकांनी मोठय़ा श्रद्धेने केली होती परंतु जेव्हा हत्तींनी मान, हुळंद भागातल्या भातशेती, केळी आदी उत्पन्नावर ताव मारण्याबरोबर मालमत्तेचा विध्वंस आरंभला तेव्हाच हत्ती आणि मानव यांच्यातला संघर्ष तीव्र होत गेला.
2002 साली कणकुंबी वनक्षेत्रात आलेल्या एकूण 21 हत्तींपैकी सात हत्तींनी आपला मुक्काम महाराष्ट्र राज्यातल्या मांगेलीकडे वळविला आणि तेथील लोकांच्या शेती आणि बागायती पिकांची प्रचंड नासधूस आरंभली. कारवार जिल्हय़ातल्या दांडेली जंगलात वास्तव्यास असलेल्या हत्तींनी सुरक्षित नैसर्गिक अधिवास आणि अन्नपाण्याच्या शोधार्थ आमगाव, चिखले, पारवाड, बेटणे, कणकुंबी, चोर्लामार्गे मांगेलीत प्रवेश केला. एकेकाळी हत्तीने कारवार जिल्हय़ातल्या दांडेलीच्या जंगलात स्थलांतर केले होते. 1970 च्या सुमारास 130 हत्तींच्या पाच कळपांनी कारवार जिल्हय़ात प्रवेश केला होता परंतु या परिसरात 1944 ते 1990 च्या कालखंडात नऊ धरणांचे प्रकल्प उभे राहिले आणि त्यात जंगलक्षेत्राची अपरिमित हानी झाली. ज्या बांबुवरती हत्ती गुजराण करायचे, त्यांचा वापर कागद निर्मितीसाठी होऊ लागला आणि त्यामुळे नैसर्गिक अधिवासात अन्न, पाणी मिळणे कठीण झाल्याने हत्तींनी लोकवस्तीच्या क्षेत्रातल्या शेती आणि बागायती पिकांवर ताव मारायला प्रारंभ केला आणि त्यामुळे हत्ती-मानव संघर्ष तीव्र होत गेला आणि 1980 च्या दरम्यान त्यातले बरेच हत्ती मृत्यूमुखी पडले. कारवार हा कर्नाटक राज्यातल्या सधन जंगलानी समृद्ध असलेला जिल्हा असल्याने हत्तींनी इथे आगमन केले होते परंतु इथेही त्यांना प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागल्याने हत्तींना तिळारी धरणाच्या जलाशयाचे मुक्त वनक्षेत्र खुणावू लागले. कारवारहून 1956 साली एक नर सुळेवाला महाराष्ट्राच्या आंबोलीच्या जंगलात तर 1960 साली आजरा वनक्षेत्रात आल्याने तेथील लोकांना मनःस्ताप सोसावा लागला होता परंतु 2001 साली 21 हत्तींचा कळप तिळारी खोऱयात मोठय़ा संख्येने वळल्याकारणाने आणि महाराष्ट्र वनखात्याने या समस्येला सामोरे जाण्यासाठी गांभीर्याने विशेष पूर्वतयारी केलेली नसल्याने कारवारसारख्या परिस्थितीची तिळारी-माणगावात पुनरावृत्ती झाली आणि त्याची जबरदस्त किंमत इथल्या मानवी समाजाबरोबर हत्तींनादेखील चुकती करावी लागली.
2005 साली हत्तींनी आपला मुक्काम धामणे, हाजगोळी परिसरात केल्यानंतर म्हावळुंगेमार्गे पुन्हा कणकुंबी वनक्षेत्राकडे वळले आणि तेथून त्यांनी कोल्हापूर जिल्हय़ातल्या चंदगड तालुक्यातल्या शेती आणि बागायती पिकांना फस्त करण्याबरोबर येथील लोकांच्या जीवाला संकटग्रस्त केले. महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे जे हत्ती आले त्याला कोणती पार्श्वभूमी कारण ठरली याचा गंभीरपणे विचार करण्याऐवजी कर्नाटकातले हत्ती आपल्याकडे नको अशी भूमिका पत्करून त्यांची पाठवणी करण्याची मोहीम आखली. 2004 साली 16 हत्तींच्या कळपाला कर्नाटकात हाकलून लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली असता, चार हत्तींनी या मोहिमेला प्रतिसाद दिला नाही. 2006 साली सहा हत्तींचा कळप पुन्हा दोडामार्ग तालुक्यात परत आला. चंदगड तालुक्यातल्या धामणे, अजगोळी, मादुवळे, जंगमहट्टी, आंबेवाडी, पाटणे, जेलगुडे, करंजगाव येथे हत्तींनी आरंभलेल्या उपद्रवामुळे तेथील लोक त्रस्त झाले होते आणि या परिस्थितीला तोंड देताना महाराष्ट्राच्या वनखात्याची दमछाक झाल्याने त्याचे पर्यवसान हत्तीविरुद्ध षड्यंत्र आखण्यात झाले. 22 फेब्रुवारी 2006 रोजी तीन मादी आणि एका नराला विजेच्या धक्कातंत्राने निर्घृणपणे ठार करण्याची दुर्घटना उद्भवली.
महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हय़ात धुमाकूळ घालणाऱया हत्तींनी दोडामार्ग तालुक्यात प्रवेश केला आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना गोव्यातल्या वनखात्याच्या नाकी नऊ आले. निर्माण झालेल्या संघर्षात बार्देसातल्या रेवोडय़ात एका आणि पेडणेतल्या इब्रामपुरातील एका अशा दोन व्यक्तींचे हत्तीने बळी घेतले. डिसेंबर 2005 ते जानेवारी 2006 पर्यंत हत्तींनी गोव्यात उपद्रव निर्माण करून ते पुन्हा महाराष्ट्राकडे वळले. सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातल्या लोकप्रक्षोभात वृद्धी झाल्याने महाराष्ट्र सरकारने कर्नाटक राज्यातून प्रशिक्षित हत्ती आणि माहुतांना आणून तीन हत्तींना पकडण्याचे ठरविले. यापूर्वी 2015 साली ज्या हत्तीला पकडून प्रशिक्षण दिले होते त्याच्या साहाय्याने तीन हत्तींना जेरबंद करून त्यांना आंबेरी छावणीत आणण्यासाठी इंजेक्शन्स देण्यात आली परंतु त्यात या तीन हत्तींना दुर्दैवी मृत्यू आला.
कर्नाटकातून महाराष्ट्रातल्या तिळारी जलाशयाकडे हत्तींनी जेव्हा मुक्काम ठोकला होता तेव्हाच त्यांच्यासाठी हा परिसर नैसर्गिक अधिवासात परिवर्तित केला असता तर मानव-हत्ती यांच्यातला संघर्ष इतका शिगेला पोहोचला नसता. त्याऐवजी वनखात्याच्या अधिकाऱयांनी हत्तींची कर्नाटकात पाठवणी करण्यासाठी आततायीपणे जे उपद्व्याप केले त्यात हत्ती आणि मानवी समाज या दोन्ही घटकांचे अपरिमित नुकसान सोसण्याची पाळी आली. मिरची पूड, तंबाखु, फटाके, अग्नीगोळे, मधमाशा त्याचप्रमाणे सौर कुंपण अशा नानाविविध उपाययोजना हत्तींना रोखण्यासाठी वापरल्या. कोटय़वधी रुपये शेती, बागायती पिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी खर्च करावे लागले परंतु असे असताना या समस्येचे पूर्णपणे निराकरण झालेले नाही. महाराष्ट्र सरकारने तिळारीतल्या 29.53 चौरस किलोमीटर क्षेत्रातल्या जंगलाला तिळारी संवर्धन क्षेत्राचा दर्जा दिलेला असला तरी तेथे असलेल्या हत्ती, पट्टेरी वाघ, अस्वल, बिबटा अशा वन्यजीवांच्या रक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसुविधा पुरविलेल्या नाहीत. जंगली श्वापदांची शिकार, जंगलतोड रोखलेली नाही. त्यामुळे येथील हत्तींना अस्तित्वासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागणार आहे.
राजेंद्र पां. केरकर